Tanha Pola Accident : आकाश पाळण्यात बसली, चामडीसहीत केस झाले वेगळे, यवतमाळच्या महिलेसोबत अंगाचा थरकाप उडवणारी घटना
आकाश पाळण्यात बसताना इतका मोठा अपघात होऊ शकतो, याची कल्पनाही कोणी केली नसेल. नेमकं काय घडलं आणि महिलेच्या केसांसोबत डोक्याची चामडी कशी निघाली?

विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ : तान्हा पोळ्यानिमित्त महागाव फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आयोजित यात्रेत शुक्रवारी दुपारी थरारक दुर्घटना घडली. आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचे केस पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकल्याने केसांसह डोक्याची चामडी निघाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने यात्रास्थळी एकच खळबळ उडाली. फुलसावंगी येथील बाली मारोती टाळीकोटे (वय 25) या आकाश पाळण्यात बसल्या होत्या. दुपारी सुमारे ३ वाजता पाळणा सुरू असताना अचानक त्यांचे केस बेरिंगमध्ये अडकले. पाळणा सुरू असल्याने काही क्षणांतच केस जोराने ओढले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटना लक्षात येताच उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे आणि जमादार सुहास कायटे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने पाळणा थांबविला. जखमी महिलेला पाळण्यातून बाहेर काढून त्वरित रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
आनंदासाठी जमले होते, पण क्षणार्धात भीतीचं वातावरण
तान्हा पोळ्यानिमित्त यात्रेत मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक जमले होते. मात्र, आकाश पाळण्यात घडलेल्या या दुर्घटनेने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांपूर्वी आनंदाने सुरू असलेल्या यात्रेत अचानक आरडाओरड आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर यात्रेतील मनोरंजनाच्या साधनांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आकाश पाळण्याची देखभाल, बेरिंगसह यंत्रणेची तपासणी आणि सुरक्षेच्या उपाययोजना योग्य पद्धतीने करण्यात आल्या होत्या का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
View this post on Instagram
व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून चिंता
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी महिलेच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. काहींनी केस ओढले गेले तरी किती वेदना होतात, मग या महिलेला किती त्रास झाला असेल, अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी महिलांनी केसांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.
एका नेटकऱ्याने स्वतःचा अनुभव सांगत मशीनमध्ये केस अडकल्याची आठवण करून दिली. तर काहींनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत जखमी महिला लवकर बरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यात्रेत आनंद घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर अशी वेळ आल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
