Kharif Season : पाऊस आला धावून, पिके गेले वाहून, शेतकऱ्यांची मेहनत अन् सर्वकाही पाण्यात

| Updated on: Jul 14, 2022 | 2:05 PM

अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. यामध्ये जीवीतहानी तर झाली आहेच शिवाय 4 हजार हेक्टरावरील पिकांना जलसमाधी मिळाली आहे. यंदाच्या पावसात अति पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये 32 हजार हेक्टर वर शेत पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने जारी केला आहे. यामध्ये एकट्या मोर्शी तालुक्यात 15 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Kharif Season : पाऊस आला धावून, पिके गेले वाहून, शेतकऱ्यांची मेहनत अन् सर्वकाही पाण्यात
अमरावती जिल्ह्यामध्ये विहिरींना तळ्याचे स्वरुप आले असून पिके पाण्यात आहेत.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : जूनच्या अखेरपर्यंत (Kharif Sowing) खरिपातील पेरण्या होतील की नाही अशी स्थिती सबंध राज्यात होती. मान्सूनच्या अनियमिततेमुळे पेरण्या सोडा पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न मार्गी लागतो की नाही याची भ्रांत होती. मात्र, जुलैच्या पहिल्या दिवसापासून (Heavy Rain) राज्यात असा काय पाऊस बरसलेला आहे की, पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रातील पिके ही पाण्यात आहेत. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे (Soybean Crop) सोयाबीनचे झाले आहे. जूनच्या अखेरीस झालेल्या अल्पशा पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले पण गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सर्वकाही पाण्यात अशी स्थिती झाली आहे. पिकांची उगवण होताच पंचनामे करावे लागत आहेत. त्यामुळे जी चिंता पावअभावी होती तीच आता अधिकच्या पावसामुळे दुपटीने वाढली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर भागात सर्वत्र पावसाने हाहाकार केला असून पिके तर पाण्यात आहेतच पण शेत जमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे गतवर्षी हंगामाच्या अंतिम टप्प्यात परतीच्या पावसाने नुकसान झाले होते तर यंदा हंगमाच्या सुरवातीलाच न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

अमरावतीमध्ये 32 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान

अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. यामध्ये जीवीतहानी तर झाली आहेच शिवाय 4 हजार हेक्टरावरील पिकांना जलसमाधी मिळाली आहे. यंदाच्या पावसात अति पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये 32 हजार हेक्टर वर शेत पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने जारी केला आहे. यामध्ये एकट्या मोर्शी तालुक्यात 15 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अति पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात चार हजार हेक्टर वरील शेत जमीन खरडून गेल्याने उभ्या पिकांना अक्षरशा शेतात समाधी मिळाली आहे. त्यामुळे पंचनाम्यांची औपचारिकता न करता सरसकट मदतीची मागणी होत आहे.

पैनगंगा नदीचे पाणी थेट शिवारात अन् पिके पाण्यात

यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आला आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने पाण्याने नदीपात्र सोडले असून या नदीलगतच्या तब्बल 20 ते 22 हजार हेक्टरावर पाणी शिरले आहे. त्यामुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. पिकांची उगवण होताच पिके पाण्यात गेल्याने आता दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्यायच उरलेला नाही. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद करुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. शिवाय प्रशासनस्तरावर मदतही केली जाणार असल्याचे सांगितले आहे. असे असले जिल्ह्यात पावसाचा जोर हा कायम आहे.

हे सुद्धा वाचा

वाशिममध्ये सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

यंदाच्या खरिपात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. पेरणीला झालेला उशिर आणि कडधान्याचे घटलेले क्षेत्र यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली होती. त्यामुळे उत्पादनही वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच पावसाने सर्वकाही पाण्यात गेले आहे. मानोरा तालुक्यात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. तर नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने सर्वाधिक फटका हा सोयाबीनला बसत आहे. आता दुबार पेरणी केली उत्पादनात वाढ होईल की नाही याबाबत शंका आहे.

नागपूरात सर्वेक्षण करण्याचे आदेश

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात पुरामुळे मोठं नुकसान आहे. तर पवनी, तुयापार, उसरीपार गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नुकसान झालेल्या भागाचे सर्वेक्षण करण्याचे महसूल विभागाला आदेश दिले आहेत. त्यानुसार घरांची पडझड आणि शेती पिकांचे झालेले नुकसान यावर प्रशासनाचे लक्ष आहे. आ. आशिष जैस्वाल यांनी पंचनाम्या संदर्भात तहसीलदार यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची कसर ही भरपाईतून मिळणार का हे पहावे लागणार आहे.