10 वर्षानंतर सोशल मीडियावरून पुन्हा भेटले, ती गावात आली अन्… सर्वच हादरले
यवतमाळमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 10 वर्षानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा दोघे भेटले. पण त्यांच्या नात्याचा शेवट हा भंयकर होता. नेमकं काय घडलं?

अनेकदा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासोबत काही कारणास्वत आपले लग्न होत नाही. मात्र, एक दिवस तिच व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यात पुन्हा आली तर? मनात असा विचार जरी आला तरी काळीज धस्स होतं. अशीच एक घटना समोर आली आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी संपुष्टात आलेले प्रेमसंबंध सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा जुळले. मात्र, या नात्याचा शेवट दोघांच्याही अत्यंत दुर्दैवी मृत्यूने झाल्याचे समोर आले.
कुठे घडली घटना?
ही धक्कादायक घटना घाटंजी तालुक्यातील मानोली येथे सोमवारी (२७ जुलै) उघडकीस आली. एक विवाहित महिला आणि विवाहित पुरुषाने गावालगतच्या शेतशिवारात विषारी औषध प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज असून, दोघांचे मृतदेह शेतात आढळून आले. गणेश नामदेव ढोले (वय ३६, रा. मानोली) आणि अंजली जोगेंद्र मीना (वय ३२, रा. रामपूरा, राजस्थान) अशी मृतांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सुमारे दहा वर्षांपूर्वी अंजली कामानिमित्त मानोली येथे आली असताना तिची गणेश ढोले याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधांत झाले. मात्र, काही काळानंतर अंजली राजस्थानला परत गेल्यावर तिचा विवाह झाला. तिला दोन मुले आहेत. इकडे गणेशचाही विवाह झाला असून त्यालाही दोन मुले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचा पुन्हा संपर्क झाला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी अंजली मानोली येथे आली होती. तिच्या येण्यावरून गणेश आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.
या वादानंतर गणेश आणि अंजली दोघेही गावालगतच्या शेतशिवारात निघून गेले, जिथे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी सकाळी शेतात गेलेल्या एका ग्रामस्थाला दोघांचे मृतदेह दिसून आले. घाटंजी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करीत आहेत. दहा वर्षांपूर्वी तुटलेले नाते सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा जोडले गेले. मात्र, या जुन्या ओळखीच्या पुनरुज्जीवनाने दोन्ही सुखी कुटुंबांची राखरांगोळी केली. या दुर्दैवी घटनेमुळे गणेश आणि अंजली यांच्या चार लहान मुलांचे छत्र हरपले असून मानोली परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.
वादातून उचलले टोकाचे पाऊल
अंजली मानोलीत आल्यानंतर गणेशच्या घरात मोठा गृहकलह निर्माण झाला होता. याच वादाच्या तणावातून दोघांनी शेतशिवारात जाऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेमागचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्याकरिता घाटंजी पोलीस नातेवाईक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत.
