Grape Rate : दर निश्चित होऊनही द्राक्ष उत्पादकांची कोंडी, काय आहेत निर्यातदारांच्या मागण्या?

| Updated on: Jan 19, 2022 | 10:39 AM

निसर्गाचा लहरीपणा, द्राक्ष उत्पादनावर होणारा खर्च अन् बाजारपेठेत मिळत असलेला दर यामुळे यंदा प्रथमच द्राक्ष बागायतदार संघाच्यावतीने द्राक्षाचे दर ठरविण्यात आले होते. शिवाय गतमहिन्यात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसह व्यापारी यांच्या उपस्थितीमध्ये जानेवारी महिन्यासाठी 82 रुपये किलो असा दर ठवरण्यात आला होता.

Grape Rate : दर निश्चित होऊनही द्राक्ष उत्पादकांची कोंडी, काय आहेत निर्यातदारांच्या मागण्या?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नाशिक : निसर्गाचा लहरीपणा, (Grape Production) द्राक्ष उत्पादनावर होणारा खर्च अन् बाजारपेठेत मिळत असलेला दर यामुळे यंदा प्रथमच (Grape Growers Association) द्राक्ष बागायतदार संघाच्यावतीने द्राक्षाचे दर ठरविण्यात आले होते. शिवाय गतमहिन्यात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसह व्यापारी यांच्या उपस्थितीमध्ये जानेवारी महिन्यासाठी 82 रुपये किलो असा दर ठवरण्यात आला होता. मात्र, आता हंगाम सुरु होत असतानाच हा दर परवडत नसल्याचे निर्यातदारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे द्राक्ष काढणी होऊनही खरेदी रखडलेली आहे. त्यामुळे मिळणारा दर परवडत नाही तर दुसरीकडे ठरलेल्या (Grape Export) दरात निर्यातदार हे द्राक्ष खरेदी करीत नाहीत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची मात्र, कोंडी झाली आहे. वाढत्या अडचणीवर पर्याय म्हणून द्राक्ष बागायतदार संघाने हा अनोखा निर्णय घेतला होता पण सुरवातीलाच अडचणींची शर्यत पार पाडवी लागत आहे. त्यामुळे आता यावर तोडगा काय निघतो हे पहावे लागणार आहे.

नेमकी निर्यातदारांची अडचण काय?

निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हीच परस्थिती असल्याने अर्थार्जन तर दूरच पण झालेला खर्चही निघत नाही. शिवाय बाजारपेठेतही दराबाबत योग्य ते धोरण ठरलेले नाही. त्यामुळे खरेदीदार मागतील त्याच दरात शेतकऱ्यांना विक्री करावी लागत होती, यावर बागायतदार संघाने तोडगा काढला होता. त्यानुसार जानेवारी महिन्यासाठी 82 प्रति किलोचा दरही ठरविण्यात आला आहे. मात्र, चार दिवसांपूर्वीच ठरलेल्या दरापेक्षा कमी दराने द्राक्षाची खरेदी केली जात असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतरही हा ठरवलेला दर परवतच नाही अशीच भूमिका निर्यातदारांनी घेतलेली आहे. त्यामुळे सर्वकाही ठप्प झाले आहे.

निर्यातदार मोजकेच असल्याने कोंडी

सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र, घोडे अडकले आहे ते द्राक्ष दरामध्ये. बैठकीत ठरलेल्या दराप्रमाणे द्राक्षांची विक्री होत नसून आता थेट 50 रुपये किलोप्रमाणे मागणी होत आहे. जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक अधिक अन् त्या तुलनेने निर्यातदार हे कमी असल्याने शेतकऱ्यांसमोर त्यांच्या शिवाय पर्यायच नाही. यातच सध्या मोजकेच निर्यातदार हे रशियामध्ये द्राक्षांची निर्यात करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण सांगावी तरी कुणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत 70 टक्के द्राक्ष बागांची काढणी झाली आहे. पण आता हे दर निर्यातीसाठी परवडत नसल्याचे सांगत काढणी कामे ठप्प आहेत.

दर मान्य नसले तरी संघाचा निर्णय हा शेतकरी हीताचाच..

महिनाभरापूर्वीच द्राक्ष बागायतदार संघाने ही दरनिश्चिती केली आहे. काही भागातील 70 टक्के द्राक्ष विक्री ही ठरलेल्या दरानेच झाली आहे. मात्र, निर्यातदारांनी किरकोळ व्यापाऱ्यांशी दर वाढवायचे सोडून शेतकऱ्यांवरच दबाव टाकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. झालेल्या निर्णयाबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वातावरणातील बदल, वाढलेला खर्च यामुळेच शेतकरी हीताचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवाय घेतलेला निर्णय यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी tv9 मराठी डिजीटल शी बोलताना सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Grape : द्राक्षे विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवरच शेतकऱ्यांचा भर, कशामुळे झाला हा बदल?

पीक पध्दतीमध्ये बदल हाच उत्पादन वाढीचा मार्ग, काय आहे कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला?

Papaya: दर निश्चिती होऊनही अंमलबजावणी नाही, बाजार समितीच्या निर्णयाला कुणाचा अडसर?