
गाजराचा हलवा आणि खीर अनेकांचा विक पॉईंट आहे. हिवाळ्यात तर गाजरांना विशेष मागणी असते. धाराशिव जिल्ह्यातील या गाजरांना राज्यातच नाही तर देशात मोठी मागणी आहे. परंडा तालुक्यातील भांडगाव येथील गाजरांचा गोडवाच न्यारा आहे. झिरो बजेट शेतीचा हा चमत्कार पाहण्यासाठी दुरून शेतकरी येतात. या गाजरांनी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळवून दिला आहे. या गाजरातून शेतकरी मालामाल झाले आहेत.
रुपयांचा खर्च नाही, उत्पन्न लाखात
धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील भांडगावच्या गाजराला आता परराज्यातही मागणी होत आहे. चवीने अतिगोड असलेल्या गाजराची मागणी वाढल्याने या गावातील शेतकर्यांना त्याचा आर्थिक फायदा होत आहे.एक रुपयाचा ही खर्च न करता एकरी दोन ते अडीच लाख रुपयांचे गाजराचे उत्पन्न या गावांमध्ये शेतकरी घेतात. ऑक्टोबर महिन्यात गाजरांची लागवड केली जाते तर डिसेंबर जानेवारीत गाजर काढणीस सुरुवात होते.
750 एकरवर गाजराची शेती
परंडा तालुक्यातील भांडगावच्या गाजराचा गोडवा देशभर पसरला आहे. या गावची लोकसंख्या जवळपास 2 हजार इतकी आहे. या गावातील 750 एकर जमिनीवर केवळ गाजराची शेती करण्यात येते. या गावातील शेतकऱ्यांना तीन महिन्यात प्रति एकर लाखोंची कमाई होते. रब्बी आणि खरीप हंगामात सुद्धा गाजर शेती करण्यात येते. जैविक शेतीमुळे, झिरो बजेट शेतीमुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होत आहे. या शेतीसाठी कोणत्याही रसायनांचा वापर करण्यात येत नाही.
जैविक शेतीचा फायदा
90-110 दिवसात गाजर येतात. तीन महिन्यात पीक तयार होते. या पिकासाठी जास्त पाण्याची गरज नसते. रासायनिक खतांचा, फवारणी करण्यात येत नाही. ही गाजर शेती पूर्णपणे जैविक आहे. येथील गाजर गोड असल्याने त्याची मागणी अधिक आहे. जर भाव चांगला मिळाला तर एकरी अडीच लाखांची कमाई होते असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परंडा तालुक्यातील भांडगावच्या गाजराचा गोडवा देशभर पसरला आहे. ऑक्टोबर महिन्यात गाजरांची लागवड केली जाते तर डिसेंबर जानेवारीत गाजर काढणीस सुरुवात होते.