पावसामुळे पीक पध्दतीमध्येच झाला बदल, भूजल पातळी वाढली अन्…!

| Updated on: Nov 15, 2021 | 6:47 PM

खरीप हंगामात पावसामुळे नुकसान झाले असले तरी याच पावसामुळे थेट पीकपध्दतीमध्येच बदल होत आहे. विशेष: मराठवाड्यात अधिकचा पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकाचे क्षेत्र घटत आहे तर ऊसाचा गोडवा हा वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

पावसामुळे पीक पध्दतीमध्येच झाला बदल, भूजल पातळी वाढली अन्...!
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : खरीप हंगामात पावसामुळे नुकसान झाले असले तरी याच पावसामुळे थेट पीकपध्दतीमध्येच बदल होत आहे. विशेष: मराठवाड्यात अधिकचा पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकाचे क्षेत्र घटत आहे तर ऊसाचा गोडवा हा वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पाण्याची टंचाई असल्याने ऊस या नगदी पिकाकडे दुर्लक्ष केले जाते. यंदा मात्र, परस्थिती ही बदलली आहे. भूजल पातळीत वाढ झाल्याचा फायदा शेतकरी घेणार आहेत.

पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडलेल्या आहेत. यातच मध्यंतरी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती तर आता पावसाचा अंदाज वर्तवल्याने मराठवाड्यात केवळ 25 टक्के क्षेत्रावरच रब्बीचा पेरा झाला आहे. त्यामुळे उत्पादनाबद्दल शंका निर्माण केली जात असल्याने आता ऊस लागवडीकडेच शेतकऱ्यांचे लक्ष वेधलेले आहे.

भूजल पातळीत वाढ

सलग दोन वर्ष मराठवाड्यात वरुणराजाची कृपादृष्टी ही राहिलेली आहे. त्यामुळे जलसाठे तुडूंब भरलेले आहेत तर भूजल पातळीत 2.79 मीटरने वाढ झालेली आहे. विशेष: लातूर जिल्ह्यात सर्वाधिक 4.37 मीटरने पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. रब्बी हंगामात हरभरा आणि गव्हाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. पण लांबणीवर पडत असलेल्या पेरण्यामुळे शेतकरी आता ऊसाकडेच आपला मोर्चा वळविणार असेच चित्र निर्माण झाले आहे.

लातूर जिल्ह्यात 65 हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र

ऊस या नगदी पिकाचे उत्पादन हे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात घेतले जाते. पण आता पाण्याची उपलब्धता असल्याने मराठवाड्यातही क्षेत्र वाढत आहे. लातूर जिल्ह्यात ऊसाचे सरासरी क्षेत्र हे 65 हजार हेक्टर आहे. पण गेल्या वर्षीपासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत असल्याने यामध्ये वाढ होणार असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गवसाने यांनी सांगितले आहे. लातूर ग्रामीण भागात ऊसाचे उत्पादन पूर्वीपासूनच घेतले जाते पण आता मांजरा नदी लगतच्या पट्ट्यात ऊस अधिक प्रमाणात घेतला जाणार आहे.

सरासरीपेक्षा दुपटीने पाऊस

मराठवाड्यात पावसाविना पिके वाया जातात असेच दरवर्षीचे चित्र असते. यंदा मात्र, परस्थिती बदलली असून अधिकच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले होते. मराठवाड्यात पावसाची सरासरी ही 679.5 मिमी असते. यावेळी मात्र, 1112.4 मिमी पाऊस मराठवाड्यात बरसलेला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात 2.3 मीटरवर असलेली पाणीपातळी ही थेट 4.37 वर गेलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न मिटलेलाच आहे पण प्रकल्पातील शेतीसाठी असलेले राखीव पाणी यंदा देण्याचा निर्णय झाला आहे.

कापूस, तूरीच्या क्षेत्रावर ऊसाचीच लागवड

खरीप हंगामातील कापूस आणि तूरीचे पिक हे अद्यापही वावरातच आहे. शिवाय या पिकांची काढणी झाल्यानंतर रब्बी हंगामातील पिके घेता येणार नाहीत. रब्बीच्या पेरणीला आगोदरच उशीर झाला आहे. तर शेतकऱ्यांचा कल हा नगदी पिकांवर जास्त आहे. त्यामुळे या दोन्ही मुख्य पिकांची काढणी झाली की, या क्षेत्रावर देखील ऊसाचीच लागवड केली जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

संबंधित बातम्या :

राज्यात उद्दिष्टापेक्षा निम्म्यानेत फळबाग लागवड, 60 हजार हेक्टरचे ‘टार्गेट’

खरीप पुर्व हंगामातील कांदाही येणार बाजारात, दरावर काय होणार परिणाम?

किसान क्रेडिट कार्डची वाढली व्याप्ती, मत्स्यव्यवसाय अन् पशुसंवर्धनासाठीही केंद्र सरकारचे राष्ट्रीय अभियान