
धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यातील धुळे नंदुरबार (Nandurbar) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात (In distribution of crop loans to farmers) आघाडी घेतली आहे. बँकेने यंदाच्या खरीप हंगामासाठी विक्रमी 298 कोटी रुपयांचा पीक कर्ज वाटप केला आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 27 हजार 834 सभासद शेतकऱ्यांना सरासरी 298 कोटी 35 लाखांचं पीक कर्ज वाटप करण्यात आलं असून यंदा उद्दिष्टापेक्षा तब्बल 106 टक्के अधिक पीक कर्ज वाटप केल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदंमबांडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत अर्ध्या टक्के व्याज दराने बँकेने खरीप पीककर्ज वाटप केलेले आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बँकेने सरासरी 79 हजार 350 पात्र शेतकऱ्यांना 304 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देखील दिला आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या वर्षात खरीप हंगामातील पिकासोबत रब्बी हंगामातील पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे, यामध्ये शेतकऱ्याचा लागलेला खर्चही निघालेला नाही, मात्र तरी देखील शेतकरी या सर्व संकटावर मात करत पुन्हा एकदा खरीप हंगामाच्या शेती मशागतीला लागला आहे. खते, बी-बियाणे यासाठी शेतकरी आता पीक कर्जाकडे वळाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत 318 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी 1 लाख 53 हजार शेतकऱ्यांना 1470 कोटी रुपयाचे उद्दिष्ट मिळाले असून, आतापर्यंत 30 हजार 109 शेतकऱ्यांना 318 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षात किंवा मागील वर्षात कर्ज घेतली असेल आणि त्यांनी नूतनीकरण जर केले, तर अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून चार टक्के आणि केंद्र शासनाकडून तीन टक्के व्याज शंभर टक्के माफ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाचा दर हा शून्य टक्के लागतो. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अग्रणी बँकेकडून करण्यात आले आहे.