Onion: सोलापुरात कांदा आवक स्थिरावूनही शेतकऱ्यांचा फायदाच, शेतीमालाच्या दरात सुधारणा

| Updated on: Feb 13, 2022 | 2:18 PM

कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे असली तरी विक्रमी आवकमुळे गेल्या दीड महिन्यापासून चर्चा होती ती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची. एकाच दिवशी 1 लाखाहून अधिक कांद्याची आवक या बाजारपेठेमध्ये झाली होती. आतापर्यंतचे कांदा आवकचे सर्व विक्रम यंदाच्या हंगामात मोडीत निघाले होते. शिवाय खरिपात प्रतिकूल परस्थिती असताना ही विक्रमी आवक झाली होती.

Onion: सोलापुरात कांदा आवक स्थिरावूनही शेतकऱ्यांचा फायदाच, शेतीमालाच्या दरात सुधारणा
लाल कांद्याबरोबर आता उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत.
Follow us on

सोलापूर : कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे असली तरी विक्रमी आवकमुळे गेल्या दीड महिन्यापासून चर्चा होती ती (Solapur) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची. एकाच दिवशी 1 लाखाहून अधिक कांद्याची आवक या बाजारपेठेमध्ये झाली होती. आतापर्यंतचे कांदा आवकचे सर्व विक्रम यंदाच्या हंगामात मोडीत निघाले होते. शिवाय (Kharif Season) खरिपात प्रतिकूल परस्थिती असताना ही (Onion Arrival) विक्रमी आवक झाली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सरासरीप्रमाणे आवक सुरु झाली आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 ते 45 हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. आवक घटल्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. प्रतिक्विंटल 500 ते 700 रुपयांनी दर वाढले आहे. यंदा प्रथमच कांद्याची विक्रमी आवक होऊनही दर हे स्थिर राहिले होते. अन्यथा आवक वाढतच कवडीमोल दराने विक्री हे ठरलेलेच होते. सध्या तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला 3 हजार 500 रुपये तर सर्वसाधारण दर हा 1800 रुपये प्रति क्विंटल आहे. यंदा मुख्य पिकांचे नुकसान झाले असले तरी या नगदी पिकाचा शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

खरिपातील कांद्याची आवक घटली

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अचानक कांद्याची आवक वाढली होती. पावसाने दिलेली उघडीप आणि कांद्याची नासाडी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी विक्रीची केलेली गडबड यामुळे ही आवक वाढली होती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवशी 1 लाख क्विंटलहून अधिक असे तीन वेळा आवक झाली होती. त्यामुळे लिलावही बंद ठेवावे लागले होते. आता खरीप हंगामातील कांद्याची आवक कमी झाली आहे. खरीप कांदाच शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे सरासरीप्रमाणे आवक सुरु झाली आहे. दिवसाकाठी 40 ते 45 हजार क्विंटलची आवक होत आहे.

हंगामाच्या सुरवातीपासूनच दर स्थिर

खरीप हंगामातील कांदाची आवक सुरु झाली तेव्हा दर कमी होतील अशी शंका होती. मात्र, मागणी अधिकची असल्याने दर कायम टिकून राहिले. शिवाय साठवणूकीसाठी पोषक वातावरण नव्हते म्हणून शेतकऱ्यांनीही विक्रीवरच भर दिला. उलट आता आवक घटली तर दरात चांगली सुधारणा झाली आहे. दराबाबत लहरी असणाऱ्या कांद्याने यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तारलेले आहे. आता उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणी कामे सुरु होईपर्यंत अशीच आवक राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

सोयाबीनचाही शेतकऱ्यांना आधार

हंगामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीनचाही शेतकऱ्यांना चांगला आधार मिळालेला आहे. गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे दर हे स्थिर होते. मात्र, आता यामध्ये 100 ते 300 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर 6 हजार 400 पर्यंत गेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे त्यांना याचा अधिकचा फायदा होत आहे. आताचे दर हेच समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी अधिकची अपेक्षा न करता सोयाबीन विक्री करणे गरजेचे असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी काय पण..! आज फॉर्च्यूनर उद्या बीएमडब्ल्यू मधूनही द्राक्ष विक्री झाली पाहिजे, कोल्हापूरच्या बहाद्दराने वेधले लक्ष

Cotton Production : बाजार समितीचा असा ‘हा’ निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार अन् बाजारपेठही फुलणार, वाचा सविस्तर

गोष्ट पडद्यामागची : शेतकऱ्यांचा रोष पीकविमा कंपन्यावर, मात्र विमा परतावा रखडण्याचे नेमके कारण काय?