कांद्याची लागवड की पेरणी, शेतकऱ्यांसाठी काय आहे सोयीस्कर..?

| Updated on: Nov 16, 2021 | 10:30 AM

सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, याला लागवड म्हणणे योग्य राहील की पेरणी हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण यापूर्वी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. पण आता बदलत्या काळात शेतकऱ्यांचा पेरणीकडे कल आहे. याला कारणेही तशीच आहेत. कांदा हे नगदी पिक असून दराबाबत बेभरवसा असे याची ओळख आहे.

कांद्याची लागवड की पेरणी, शेतकऱ्यांसाठी काय आहे सोयीस्कर..?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : सध्या रब्बी हंगामातील कांदा (Onion cultivation) लागवडीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, याला लागवड म्हणणे योग्य राहील की पेरणी हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण यापूर्वी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. पण आता बदलत्या काळात शेतकऱ्यांचा (onion sowing) पेरणीकडे कल आहे. याला कारणेही तशीच आहेत. कांदा हे नगदी पिक असून दराबाबत बेभरवसा असे याची ओळख आहे. मात्र, असे असतानाही कांदा उत्पादनावर शेतकऱ्यांचा कायम भर राहिलेला आहे. यंदा पेरणी का लागवडीचा मुद्दा निर्माण होण्यास कारणेही तशीच आहेत. गेल्या काही दिवसांपासून कांदा लागवडीचे महत्व हे सोशल मिडीयावर पटवून सांगितले जात आहे तर दुसरीकडे पेरणीपध्दत कशी फायदेशीर आहे हे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हीताचे नेमके काय याचा अचूक वेध आपण आज घेणार आहोत.

यंदा पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी हे आर्थिक अडचणीत आहेत. शिवाय शेतीमध्ये आवश्यक असलेल्या यंत्र सामुग्रीचेही दर वाढलेले आहेत. त्यामुळे कमी खर्चात अधिकची कामे कशी होतील यावरच शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. त्यातूनच कांदा लागवड फायद्याची की पेरणी हा मुद्दा समोर आला आहे.

कांदा लागवडीची प्रक्रिया

कांदा लागवड ही पारंपारिक प्रक्रिया आहे. यामध्ये सुरवातीला शेतजमिनीची मशागत करावी लागते. त्यानंतर रोप लागवड केली जाते. लागवडीनंतर दीड महिन्याने हे रोप लागवडी योग्य होते. शिवाय लागवड केलेल्या जागेतून रोप काढायचे आणि पुन्हा त्याची लागवड करायची. ही प्रक्रिया किचकट असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही खर्ची होत आहे. रोप लागवडीनंतर चार महिन्यांनी कांदा काढण्यायोग्य होतो. मात्र, दरम्यानच्या काळात रोपावरही किडीचा प्रादुर्भाव, धुईचा धोका हा कायम राहिलेला आहे.

कांदा पेरणी हाच पर्याय

कांदा पेरणी मशागत केलेल्या जमिन क्षेत्रावर केली जाते. आता ट्रक्टरच्या सहायाने कांद्याची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. कारण वातावरणातील बदलामुळे वेळेत पेरणी आवश्यक आहे. शिवाय पेरलेला कांदा हा 4 ते 5 महिन्यांमध्ये काढणी योग्य होतो. बी पेरुन रोप तयार करणे, त्याची लागवड करणे हा सर्व खर्च टाळून थेट पेरणीवरच भर दिला जात आहे. रोपाची निगराणी पुन्हा कांद्याची निगराणी यामध्ये मनुष्यबळ आणि वेळेचाही अपव्यय होत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शास आले आहे. त्यामुळेच पेरणीवर भर वाढत आहे.

पेरणी यंत्रही उपयोगाचे

शेती व्यवसाय हा यंत्रावर आधारित झालेला आहे. त्यामुळे दर हंगामात एक वेगळेच यंत्र शेतामध्ये दिसत आहे. कांद्याची पेरणी ही ट्रक्टरच्या सहायाने केली जाते किंवा आता नव्याने कृषी विद्यापीठानेही यंत्र तयार केले आहेत. यामुळे मजुरांवर होणारा खर्च तर टळलाच आहे पण बियाणांचीही बचत होत राहते. पेरणीमुळे एकरी 2 किलो बियाणे बचत होत असल्याचे कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्यावतीने सांगण्यात आलेले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार व्हावा याकरिता कृषी विज्ञान केंद्रच्या वतीने प्रात्याक्षिकेही करण्यात आलेली आहेत.

संबंधित बातम्या :

पावसामुळे पीक पध्दतीमध्येच झाला बदल, भूजल पातळी वाढली अन्…!

राज्यात उद्दिष्टापेक्षा निम्म्यानेत फळबाग लागवड, 60 हजार हेक्टरचे ‘टार्गेट’

खरीप पुर्व हंगामातील कांदाही येणार बाजारात, दरावर काय होणार परिणाम?