किसान रेलमुळे चिक्कूला मिळाली बाजारपेठ, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् खर्चात बचत

| Updated on: Jan 20, 2022 | 4:47 PM

शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून आता बाजारपेठा जवळ करण्यासाठी वेगवेगळे पर्याय खुले केले जात आहेत. त्याच माध्यमातून किसान रेल्वेची शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी मोठी मदत झाली आहे. या किसान रेलमुळे शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.

किसान रेलमुळे चिक्कूला मिळाली बाजारपेठ, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् खर्चात बचत
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

पालघर : काळाच्या ओघात उत्पादनात तर वाढ होत आहे पण योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळत नाही. शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून आता बाजारपेठा जवळ करण्यासाठी वेगवेगळे पर्याय खुले केले जात आहेत. त्याच माध्यमातून किसान रेल्वेची शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी मोठी मदत झाली आहे. या किसान रेलमुळे शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. कारण देशभरात प्रसिद्ध असलेला आणि भौगोलिक मानांकन मिळालेला डहाणूतील घोलवड आणि परिसरातील चिकू अवघ्या 24 तासात दिल्लीला पोहचत आहे. दर्जेदार चिक्कूला आता योग्य ती बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. शिवाय वाहतूकीअभावी होणारे नुकसानही टळले आहे.

वर्षभरात 35 हजार टन चिक्कूची वाहतूक

पालघर भागात चिक्कूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, जवळ मोठी बाजारपेठ नसल्यामुळे भौगोलिक मानांकन मिळालेल्या डहाणू, घोलवड येथील चिक्कूला योग्य तो दर मिळत नव्हता. मात्र, किसान रेल मुळे या भागातील चिक्कू थेट दिल्लीच्या बाजारपेठेत दाखल होत आहेत. अवघ्या 24 तासामध्येच चिक्कू बाजारात दाखल होत असल्याने दर्जाही टिकून राहत आहे आणि दरही चांगला मिळत आहे. कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या पश्चिम रेल्वेच्या किसान रेल मधून मागील वर्षभरात 123 ट्रेनमधून तब्बल 35 हजार टन चिकू दिल्लीला रवाना झाला आहे. यापूर्वी ट्रकद्वारे वाहतूक करावी लागत होती. त्यामुळे 32 ते 34 तास लागत होते. यावर किसान रेल्वेच्या माध्यमातून तोडगा निघाला आहे.

डहाणू चिक्कूला परदेशातही मागणी

पालघर मधील डहाणू , घोलवड, वाणगाव येथील चिकू हा देशभरात प्रसिद्ध असून परदेशातही या चिकुला मोठी मागणी आहे. मात्र कोरोना काळात या नाशवंत असलेल्या चिकू फळाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं होतं. नाशवंत असलेला चिकू हा वेळेत योग्य ठिकाणी पोहचत नसल्याने त्याचा मोठा फटका शेतकरी, व्यापारी आणि परिणामी चिकू खवय्यांना बसत होता. या भागातील चिकूला भौगोलिक मानांकन मिळाले असल्याने या चिकूची वेगळी अशी चव आहे.

वेळेत अन् खर्चातही बचतच

किसान रेलमुळे पालघर परिसरातील चिकू उत्पादकांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती बाजारपेठ तर मिळाली आहे पण वेळीची बचतही झाली आहे. या सुविधेच्या पूर्वी ट्रकच्या माध्यमातून वाहतूक होत असताना 34 तासाचा कालावधी लागत होता. आता यामध्ये 12 तासाची बचत झाली असून वाहतूकीचा खर्चही कमी झाला आहे. एकीककडे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आहे तर दुसरीकडे सोई-सुविधामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या :

नियम साखर कारखान्यांसाठी नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच, ‘त्या’ निर्णयावरून शेतकरी संघटना आक्रमक

वीज कापायला आल्यास ‘झटके’ देऊ, रघुनाथ पाटलांचा इशारा, न्यायालयाचे आदेश काय?

शेतकऱ्यांचे प्रश्न आता एका फोनवर लागणार मार्गी, कोणत्या राज्यात सुरु झाला अनोखा उपक्रम?