‘शेतकरी अडचणीत, तातडीनं एकरी 50 हजार अनुदान द्या’, किसान सभा टोमॅटो दर प्रश्नावर आक्रमक

| Updated on: Aug 29, 2021 | 5:04 PM

टोमॅटोचे दर अचानक कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. टोमॅटो उत्पादकांना त्यांच्या अडचणीच्या काळात सरकारने तातडीने मदत करावी आणि एकरी किमान 50 हजार रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी किसान सभा आणि समविचारी संघटनांनी केलीय.

शेतकरी अडचणीत, तातडीनं एकरी 50 हजार अनुदान द्या, किसान सभा टोमॅटो दर प्रश्नावर आक्रमक
Follow us on

अहमदनगर : टोमॅटोचे दर अचानक कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. टोमॅटो उत्पादकांना त्यांच्या अडचणीच्या काळात सरकारने तातडीने मदत करावी आणि एकरी किमान 50 हजार रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी किसान सभा आणि समविचारी संघटनांनी केलीय. या मागणीसाठी किसान सभेसह या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अकोले येथील समशेरपूर बाजार समितीमध्ये आंदोलन केलं.

शेतकरी नेते अजित नवले म्हणाले, “टोमॅटो दराचा प्रश्न सुटावा यासाठी नेपाळ पाकिस्तान व बांगलादेश या शेजारील राष्ट्रांना टोमॅटोची निर्यात करण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात. महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात टोमॅटोची कोठे मागणी आहे याचा तातडीने शोध घ्यावा. या राज्यांना टोमॅटो पुरविण्यासाठी महाराष्ट्राच्या पणन विभागाने तातडीने पावले उचलावीत. कोविड लॉकडाऊनचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी टोमॅटो प्रक्रिया उद्योग बंद आहेत. विशेष प्रोत्साहन व सवलती देऊन हे उद्योग तातडीने सुरु करण्याबाबत सरकारने पावले टाकावीत.”

“किटकनाशक-खतं कंपन्यांकडून टोमॅटो उत्पादकांचे अतोनात शोषण”

“टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना भावी काळात अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागू नये म्हणून बाजार समित्यांमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कोल्ड स्टोरेजची उभारणी करावी. टोमॅटो उत्पादकांना माल तारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. टोमॅटोचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पावले टाकावीत. टोमॅटो पिकासाठी वापरली जाणारी कीटकनाशके, विषाणू विरोधी औषधे, पोषके व खते यांची किंमत वाढवून कंपन्यांकडून टोमॅटो उत्पादकांचे अतोनात शोषण केले जाते. सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून टोमॅटो उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व निविष्ठा, खते, कीटकनाशके योग्य दरात शेतकऱ्यांना मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा,” अशा मागण्या यावेळी टोमॅटो उत्पादकांनी केल्या.

“…तर सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या दारात टोमॅटो ओतणार”

“राज्यात सध्या टोमॅटो उत्पादकांवर प्रचंड संकट आले असताना राज्यातील सत्ताधारी व विरोधक मात्र भलत्याच विषयांवर एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. ही अत्यंत संतापजनक बाब आहे. राज्यकर्त्यांनी व विरोधकांनी या संकटाच्या काळात तरी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल गांभीर्याने पावले टाकावीत. असे जर झाले नाही तर मात्र सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या दारात टोमॅटो ओतण्याचे आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

किसान सभा व समविचारी शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामध्ये डॉ. अजित नवले, संदीप दराडे,महेश नवले, सुरेश नवले, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, पांडुरंग कातोरे, अविनाश धुमाळ, शंकर चोखंडे, तुकाराम मेंगाळ, दगु एखंडे, निवृत्ती नाना बेणके, सुनिल दराडे आदी कार्यकर्त्यांसह परिसरातील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने सामील झाले होते.

हेही वाचा :

तालिबान्यांचं उत्पन्न गांज्यातून, आता शेतकरीही तिच मागणी करतोय, दखल घ्या अन्य़था महागात पडेल : राजू शेट्टी

आंदोलक शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे अधिकाऱ्याचे आदेश, करनालचा व्हिडीओ व्हायरल

राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यात अडकले, त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही : बाबा आढाव

व्हिडीओ पाहा :

Kisan Sabha and other farmer organizations protest for fair farm produce price