गणेशजी खरं खरं सांगा, कमाई जास्त कुठे? लातूरच्या शेतकऱ्याला मोदींचा लाईव्ह सवाल

| Updated on: Dec 25, 2020 | 12:57 PM

लातूरमधील गणेश राजेद्रं भोसले (Latur Farmer Ganesh Rajendra Bhosle) यांनी या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभाग घेतला.

गणेशजी खरं खरं सांगा, कमाई जास्त कुठे? लातूरच्या शेतकऱ्याला मोदींचा लाईव्ह सवाल
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) वितरणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी विविध राज्यातील शेतकऱ्यांचा अनुभव जाणून घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी शेतकऱ्यांना पीकपाणी, पीक विमा, पशुपालन यासह वेगवेगळ्या विषयांवर बोलतं केलं. यावेळी महाराष्ट्रातून लातूरच्या शेतकऱ्याने (Latur Farmer Ganesh Rajendra Bhosle interact with PM Narendra Modi) मोदींशी संवाद साधला.

लातूरमधील औसा तालुक्यातील मातुला गावचे गणेश राजेद्रं भोसले (Latur Farmer Ganesh Rajendra Bhosle) यांनी या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभाग घेतला. गणेश भोसले हे पीएम किसान योजना आणि प्रधानमंत्री फसल योजनेचे लाभार्थी आहेत.

“गणेशची नमस्ते, रामराम किती जमीन, शेतीशिवाय कोणता व्यवसाय करता” अशा प्रश्नांनी मोदींनी संभाषणाला सुरुवात केली. माझ्याजवळ 3 हेक्टर जमीन आहे. त्यामध्ये मी सोयाबीन आणि तूर ही पीकं घेतो, असं गणेश भोसलेंनी सांगितलं. त्यावर मोदींनी तुम्ही आधी काय करत होता असा प्रश्न विचारला. त्यावर गणेश भोसलेंनी सोयाबीन, तूर, डाळी घेत असल्याचं सांगितलं.

शेतीशिवाय तुम्ही काय करता असाही प्रश्न मोदींना विचारला.

त्यावर गणेश भोसले म्हणाले, “शेतीशिवाय माझ्याकडे 9 गायी, 13 म्हैशी आहेत. पशुपालनातून मिळालेले पैसे शेतीसाठी खर्च करतो”

नेमका हाच धागा पकडत मोदी गणेश भोसलेंना म्हणाले, मला हे सांगा, अगदी खरंखरं सांगा, शेतात जास्त कमाई होते की पशुपालनामध्ये?

त्यावर गणेश भोसले म्हणाले, शेतातही होते आणि पशुपालनातून दूध मिळते, त्यातून जे पैसे मिळतात कुटुंब आणि शेती चालते.

यानंतर मोदी म्हणाले, पीकविमा योजनेचा लाभ तुम्हाला झाला का?

हा, मी अनेक वर्षांपासून पीकविमा योजनेचा लाभार्थी आहे. 2019 च्या हंगामात पंतप्रधान पीकविमान योजनेचा लाभ घेतला, असं भोसलेंनी सांगितलं.

तुम्हाला किती पैसे मिळाले?, मोदींचा सवाल

गेल्या वर्षी 2580 रुपयांचा हप्ता भरला होता. मात्र गेल्यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे मला 54 हजार रुपयांची भरपाई मिळाली, असं गणेश भोसलेंनी सांगितलं.

त्यावर मोदी म्हणाले, म्हणजे तुम्ही 2580 भरले आणि 54 हजार मिळाले, हे सर्व गावातील शेतकऱ्यांना माहिती आहे का?

भोसले म्हणाले, हो सर्वांना माहिती आहे, आता सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मला आनंद आहे, या योजनेचा सर्वांना लाभ होत आहे. ही खूर चांगली योजना आहे.

यावर मोदींनी गणेश भोसलेंचं अभिनंदन केलं.

संबंधित बातम्या 

PM Modi LIVE : केसीसी कार्ड न मिळाल्यास ते प्राप्त करा आणि त्याचा उपयोग करा, मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन