Maharashtra Manson Alert: उधळीत येरे गुलाल पावसा…देशात या तारखेला मान्सूनची एंट्री! 10 राज्यांना मोठा अलर्ट
Maharashtra Monsoon Alert : हवामान विभागाने आनंदवार्ता दिली आहे. त्यानुसार मान्सून लवकरच धडकणार आहे. देशातील 10 हून अधिक राज्यात तुफान पाऊस, सोसाट्याचा वारा वाहणार आहे. त्यामुळे या उकाड्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Monsoon Alert : हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार दक्षिण-पश्चिम मान्सून आता वेगाने पुढे सरकत आहे. मान्सून येत्या 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून देशात सक्रिय होण्यासाठी दोन-तीन दिवस लागू शकतात. तर IMD ने मंगळवारी देशातील कमीत कमी 10 राज्यांमध्ये मुसळधार वारे, सोसाट्याचा वारा आणि धुळीच्या वादळांचा इशारा दिला आहे. वीज पडण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.
या राज्यात मान्सूनचा दिलासा
हवामान खात्यानुसार, 19 ते 22 मे दरम्यान जम्मू आणि काश्मीर, 20 ते 22 मे दरम्यान उत्तराखंड या राज्यात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या राज्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. अंदमान व निकोबार बेटांवर 19 ते 24 मे दरम्यान पावसाचा परिणाम दिसून येईल. तर पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह ओडिसा ते पश्चिम बंगालपर्यंत सर्वदूर पावसाला बहर येणार आहे. मध्य भारतात मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. या भागातील नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे.
नैऋत्य मान्सूनची झपाट्याने वाटचाल
नैऋत्य मान्सून मोठी कूच करत महाराष्ट्रासह पश्चिम भागात चालून येत आहे. सध्या अंदमान आणि निकोबार बेटांना मान्सूनने विळखा घातला आहे. परिणामी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अरब सागराजवळून बंगालच्या उपसागरात मान्सून सक्रिय झाल्याचे चित्र आहे. पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकासह मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे विदर्भ वगळता राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी दिसून येईल.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर पावसाचा रेनबो डान्स पाहायला मिळू शकतो. रत्नागिरी, सातारा यासह पश्चिम विदर्भातील यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होऊन तापमान कमी होण्यास मदत मिळू शकते. पण यामुळे रात्रीचा उकाडा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर विदर्भातील अनेक जिल्हे सध्या उष्णतेने पोळून निघाले आहेत. पशू-पक्षी आणि प्राण्यांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला आहे. पण पुढील आठवड्यात अनेक भागात आल्हाददायक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.