Agricultural Pump: अहो खरंच..! शेतकऱ्यांच्या हितासाठी महावितरणचे अधिकारी रस्त्यावर, आता उरले 11 दिवस

| Updated on: Mar 20, 2022 | 11:09 AM

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यावरुन शेतकरी आणि महावितरणच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये कायम मतभेद आपण पाहिलेले आहेत. यावेळी रब्बी हंगामात तर याची अनुभती अधिकच आलेली आहे. वेळप्रसंगी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातलेला होता तर कधी महावितरणचे कार्यालयच पेटवून दिल्याच्याही घटना घडल्या. असे असताना आता कृषी धोरण 2020 या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महावितरणच प्रयत्न करीत आहे.

Agricultural Pump: अहो खरंच..! शेतकऱ्यांच्या हितासाठी महावितरणचे अधिकारी रस्त्यावर, आता उरले 11 दिवस
कृषी धोरण 2020 या योजनेची जनजागृती महावितरणचे अधिकारी गावोगावी जाऊन करीत आहेत.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लासलगाव :  (Agricultural Pump) कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यावरुन शेतकरी आणि महावितरणच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये कायम मतभेद आपण पाहिलेले आहेत. यावेळी (Rabi Season) रब्बी हंगामात तर याची अनुभती अधिकच आलेली आहे. वेळप्रसंगी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातलेला होता तर कधी महावितरणचे कार्यालयच पेटवून दिल्याच्याही घटना घडल्या. असे असताना आता (Agricultural Policy) कृषी धोरण 2020 या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महावितरणच प्रयत्न करीत आहे. योजनेत सहभाग घेतला तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शिवाय ही योजना काय आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी याअनुंशाने निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत उपविभागातील पिंपळगाव,खेडेगाव,वरखेडा,चिंचखेड,पालखेड ,शिरवाडे वणी, कोकणगाव, साकोरा अशा 38 गावांमधून 70 ते 80 महावितरण अधिकारी कर्मचारी यांनी मोटारसायकल रॅली काढून ग्राहकांचे प्रबोधन केले आहे. योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढण्यासाठी सर्वकाही केले जात आहे.

काय आहे योजना ?

कृषीपंपासाठी ही योजना असली तरी फार पूर्वीची थकबाकी वसुल करुन शेतकऱ्यांना चालू बिलापर्यंत आणण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. यामध्ये सप्टेंबर 2020 अखेर असलेल्या थकबाकीतील दंड-व्याज माफ करून, व्याजाचे पुनर्गठन करून, वीज बिलाची दुरुस्ती करून सुधारित थकबाकी निश्चित केली आहे. त्यानुसार सुधारित थकबाकीवर 50 टक्के माफी देऊन उर्वरीत 50 टक्के वसुल करुन थकबाकीमुक्त करण्याचे धोरण आहे. शिवाय वसुल झालेल्या रकमेपैकी 66 टक्के ही ‘कृषी आकस्मिक निधीतून’ वीज यंत्रणेतील विकास कामांवर खर्च केला जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांनी 50 टक्के रक्कम अदा करुन त्या रकमेचा वापर हा शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल अदा केले तरी त्याचा उपयोग त्यांच्यासाठीच होणार आहे.

गावोगावी जाऊन प्रबोधन

महावितरणच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची शेतकऱ्यांना माहिती मिळावी तसेच योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा या हेतूने सध्या जनजागृती केली जात आहे. गावोगावी जाऊन महावितरणचे अधिकारी हे योजनेची माहिती देत आहेत. शिवाय योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया काय आहे. शेतकऱ्यांचा लाभ कसा हे पटवून दिले जात आहे. निफाड तालुक्यात सध्या महावितरणचे कर्मचारी हे मोटारसायकलहून रॅली काढत जनजागृती करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही योजनेचे स्वरुप लक्षात येत आहे.

आता उरले 11 दिवस

कृषी धोरण -2020 या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 31 मार्च ही डेडलाईन ठरविण्यात आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांचा सहभाग झाला नसला तरी उर्वरीत 11 दिवसांमध्ये सहभाग वाढवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय कृषीपंपाची विद्युत जोडणी केल्यामुळे शेतकरीही सकारात्मक झाले आहेत. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा आणि कृषी पंपावरील वाढत्या थकबाकीचा आकडाही कमी व्हावा यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

संबंधित बातम्या :

Mango : अवकाळीनंतर वाढीव तापमानाचा धोका, उन्हामुळे भाजलेल्या आंब्याचे होते तरी काय ?

Washim : खरिपातील दोन्ही शेतीमालाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांचे ‘टायमिंग’ चुकले

YAVATMAL मध्ये खाणीतील धुळीने पीक काळवंडली, शेतकरी चिंतेत; आंदोलनाचा इशारा