बेदाण्यासाठी सुद्धा द्राक्ष कुणी घेईना, गारपीटीने द्राक्ष झाडावरच सडला; द्राक्ष उकिरडयावर फेकण्याची वेळ

व्यापारीशी पन्नास रुपये दराने व्यवहार झाला, सोमवारपासून द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होण्या अगोदरच रविवारी संध्याकाळी गारपीट अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

बेदाण्यासाठी सुद्धा द्राक्ष कुणी घेईना, गारपीटीने द्राक्ष झाडावरच सडला; द्राक्ष उकिरडयावर फेकण्याची वेळ
Image Credit source: Google
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: Apr 14, 2023 | 10:34 AM

नाशिक : द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना रविवारी संध्याकाळी गारपीट आणि अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने त्याचे परिणाम आता शेती पिकांवर दिसण्यास सुरुवात झाले आहे. द्राक्ष बागेतील उभ्या पिकावरील द्राक्ष सडण्यास सुरुवात झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर, सायखेडा चांदोरी, शिंगवे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, निफाड, उगाव, वनसगाव, सारोळे,खडक माळेगाव या गावांना सलग तीन-चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोपून काढल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. टाकळी विंचूर येथील गोविंद टोपे या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांने तीन एकरावर द्राक्षाची लागवड केली असून आठ ते नऊ लाख रुपये खर्च करून द्राक्षाचे पीक जोमदार घेतले होते.

व्यापारीशी पन्नास रुपये दराने व्यवहार झाला. सोमवारपासून द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होण्या अगोदरच रविवारी संध्याकाळी गारपीट आणि  अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

उभ्या द्राक्ष बागेवरील पिकांना तडे गेल्याने द्राक्ष सडण्यास सुरुवात झाली आहे. द्राक्षांवर चाचण देखील बसत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. द्राक्ष काढून फेकण्यासाठीही पैसा शिल्लक नाही. बँकेचे घेतलेले कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असे प्रश्न मनात घर करून राहत आहे.

पुढील पीक कसे घ्यावे यासह अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहिल्याने संपूर्ण कर्जमाफी करत पुढील पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये रोख मदत करावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहे. मागील नुकसाणीच्या वेळी पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीची आस लागली होती.

द्राक्ष बागा यंदाच्या वर्षी मोठ्या संकटात सापडल्या आहे. यामध्ये द्राक्ष घड हे झाडावरच सडू लागल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आता हे द्राक्ष काढून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक नसल्याने करायचे काय असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

द्राक्ष खराब झाला तर त्याचे प्रमाण बघून बेदाणा तयार करण्यासाठी त्याची खरेदी होण्याची शक्यता असते. मात्र, आत्ता झालेले नुकसान बघता त्याचा बेदाणा होईल अशीही स्थिती फारशी नाही. त्यामुळे मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून उकिरड्यावर द्राक्ष फेकण्याची वेळ आली आहे.

Follow Us