पैसा हवाच, पण जगण्याचं नैतिक बळही मागतोय बळीराजा, शासन म्हणून आधी दिलासा आणि मगच पंचनामा

| Updated on: Apr 17, 2023 | 12:07 PM

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पंचनामा केला जात आहे. यामध्ये हतबल शेतकऱ्यांना मोठा देण्याचे कामही शासकीय अधिकाऱ्यांना करावे लागत आहे.

पैसा हवाच, पण जगण्याचं नैतिक बळही मागतोय बळीराजा, शासन म्हणून आधी दिलासा आणि मगच पंचनामा
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : संपूर्ण राज्यात कुठे कडक उन्हाचा तडाखा तर कुठे गारांचा पाऊस पडत आहे. मागील आठवड्यात राज्यातील सहा ते सात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, डाळिंब, गहू आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. सलग सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः नुकसान झाल्याने बळीराजा अक्षरशः उद्ध्वस्त झाला होता. नाशिक जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासनाकडून काही रक्कम प्राप्त झाली असून त्यानुसार पंचनामे करून तात्काळ मदत दिली जाणार आहे.

त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 208 गावे बाधित तर 25 हजार 985 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पावसाने एकूण 13 हजार 909 हेक्टर वरील शेतीपिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला होता. त्यामध्ये कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले होते.

10 हजार 725 हेक्टरवरील कांद्याला फटका बसला होता. कांद्या खालोखाल 792 हेक्टरवरील डाळिंब, 771 हेक्टरवरील द्राक्ष आणि 627 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले होते.

हे सुद्धा वाचा

आता तलाठी, मंडल अधिकारी आणि इतर कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करून पंचनामे करत आहे. याच दरम्यान शासन म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देणं आणि त्यानंतर पंचनामा करावा लागत आहे. शेतकरी हतबल झाल्याने शासनाला दुहेरी भूमिका बजवावी लागत आहे.

नाशिकच्या सटाणा, दिंडोरी आणि निफाड या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानुसार आज दिंडोरी तालुक्यात आज पंचनामे सुरू झाले असून अहवाल दोन दिवसांत शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट मदत जाहीर केली जाणार आहे. खरंतर सलग आठ दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाहणी केली होती. त्यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असतांना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, लवकरात लवकर कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करेल असा शब्द देतो असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटले होते. त्यामुळे प्रत्यक्षात आता पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा लागून आहे.