कापसाला नव्हे तर बोंडअळीला पोषक वातावरण, शेतकऱ्यांकडे आता एकच पर्याय

| Updated on: Nov 28, 2021 | 10:38 AM

खरीप हंगामातील कापूस वेचणी आता अंतिम टप्प्यात आहे. असे असताना कापसावर बोंडअळीचा अधिकचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणातील बदल आणि शेतकऱ्यांनी वाढीव उत्पादनासाठी घेतलेली भूमिका यामुळे बोंडअळीचा जोर अणखीनच वाढत आहे. त्याचा परिणाम पिकासह कापूस लागवड केलेल्या शेतजमिनीवरही होऊ लागला आहे.

कापसाला नव्हे तर बोंडअळीला पोषक वातावरण, शेतकऱ्यांकडे आता एकच पर्याय
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

जळगाव : खरीप हंगामातील कापूस वेचणी आता अंतिम टप्प्यात आहे. असे असताना कापसावर बोंडअळीचा अधिकचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणातील बदल आणि शेतकऱ्यांनी वाढीव उत्पादनासाठी घेतलेली भूमिका यामुळे बोंडअळीचा जोर अणखीनच वाढत आहे. त्याचा परिणाम पिकासह कापूस लागवड केलेल्या शेतजमिनीवरही होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोंडअळीचा बंदोबस्त करुन वाढीव उत्पदनासाठी जे फरदड उत्पादन घेतले जाते ते टाळणे आवश्यक आहे.

खानदेशात कापसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते मात्र, यापूर्वीच अतिवृष्टीचा फटका खरिपातील सर्वच पिकांना बसलेला होता. तर आता गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कापूस पिक हे काढून फेकून देण्याची नामुष्की जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. कारण जिल्ह्यातील तब्बल 5 लाख 39 हजार हेक्टरावरील कापसाला बोंड अळीने घेरल्याचा अहवालच कृषी विभागाने सादर केला आहे. एवढेच नाही बोंड अळीच्या बंदोबस्ताच्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांना देखील बैठक घेण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे बोंडअळीचा बंदोबस्त हेच कृषी विभागाचे टार्गेट आहे.

यामुळे वाढत आहे बोंडअळीचा प्रादुर्भाव

यंदा राज्यभर सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला एवढेच नाही तर हा पाऊस लांबलाही होता. त्यामुळे कापूस पिकाचा हंगाम अद्यापही सुरुच आहे. लांबलेल्या हंगामामुळे बोंडअळीला अखंडित अन्नपुरवठा हा सुरुच आहे. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव हा वाढतच आहे. बोंडअळीमुळे कापसाचे तर नुकसान होत आहेच शिवाय शेतजमिनीवरही याचा परिणाम होतो. आगामी हंगामातील पिक उगवण तसेच पिक वाढीवरही या अळीचा प्रादुर्भाव कायम राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेली पिके ही शेतातून काढून बांधावर फेकणे गरजेचे आहे.

फरडद उत्पादनामुळे अधिकचे नुकसान

फरदडमुळे कपाशीचा दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरित वाणांची लागवड होते. या वाणांवर गुलाबी बोंड आळी च्या जास्त पिढ्या पूर्ण होतात. परिणामी या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत अन्न पुरवठा होत असल्याने व जीवनक्रम एकमेकात मिसळल्याने त्यांच्या संख्येत वाढ होते. फरदड जास्त काळापर्यंत कच्चा कपाशीची जिनींग मध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केली जाते. त्यामुळे गुलाबी बोंड आळी आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. कापूस पिकाच्या फरदडमुळे उत्पादनात वाढ होणार असली तरी एकप्रकारे आपण बोंडअळीच्या वाढीलाच खतपाणी घालत असतो.

वाढीव उत्पादनापेक्षा रब्बी हंगामातील पेरणी उत्तम

कापसातून अधिकचे उत्पादन मिळावे याअनुशंगानेच फरदड पिक घेतले जाते. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिकच वाढत जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची काढणी करुन त्या क्षेत्रावर रब्बी हंगमातील पिकांची पेरणी करणे फायद्याचे राहणार आहे. यामुळे पिक पध्दतीमध्येही बदल होईल आणि बोंडअळीचा प्रादुर्भावही वाढणार नाही. रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, बाजरी, मका यांचा पेरा करण्याचे अवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

किड नियंत्रणासाठी आता कृषीरथ

जळगाव जिल्ह्यासह खानदेशात कापसाचे अधिकचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी गुलाबी बोंडअळीमुळे उत्पादनावर तर परिणाम होतोच पण शेतजमिनीचा दर्जाही खालावत आहे. त्यामुळे आता कृषीरथाच्या माध्यमातून बोंडअळीबाबत जनजागृती करण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने आखले आहे. यामध्ये कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्याअनुशंगानेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुचना केल्या आहेत. या कृषीरथाचा फायदा किमान आगामी हंगामात तरी होईल.

संबंधित बातम्या :

यशोगाथा : उसापेक्षा सोयाबीन बिजोत्पदनात अधिकचा गोडवा, कंधारच्या शेतकऱ्याने करुन दाखविले

भारत देशातील गहू स्वस्त अन् मस्तही, जागतिक बाजारपेठेतही घेतली जातेय दखल

…तरीही सोयाबीनवरच भर, बिजोत्पादनासाठी महाबीजच्या मदतीला कृषी विभागही सरसावला