Pandharpur : ‘विठ्ठल’ कारखान्याच्या 12 माजी संचालकांना नोटीसा, सत्तांतरानंतर अध्यक्ष अभिजीत पाटलांचा निर्णय

निवडणुकांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्या ताब्यात होता. मात्र, निवडणुकीनंतर चित्र बदलले आहे. कारखान्याचा पदभार स्विकारताच थकीत रक्कम वसुलीसाठी अभिजीत पाटील यांनी जवळपास 400 लोकांना नोटीसा बजावल्या आहेत.

Pandharpur : विठ्ठल कारखान्याच्या 12 माजी संचालकांना नोटीसा, सत्तांतरानंतर अध्यक्ष अभिजीत पाटलांचा निर्णय
विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर
| Edited By: | Updated on: Jul 24, 2022 | 10:44 AM

पंढरपूर : ‘घर फिरले की घराचे वासेदेखील फिरतात’ असाच काहीसा प्रत्यय (Vitthal Sugar Factory) विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात येत आहे. यंदाच्या  (Factory Election) कारखाना निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. त्यामुळे अध्यक्षपदी आता (Abhijit Patil) अभिजीत पाटील हे असून त्यांनी पदभार स्विकारताच कारखान्याच्या 12 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी माजी अध्यक्षांसह जवळपास चारशे लोकांना कारखान्याने नोटिसा पाठवल्या आहेत. यामुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्तांतरानंतरचा हा बदल असून आता या नोटीसाला काय उत्तर दिले जाणार हे पहावे लागणार आहे.

नोटीसांचे नेमके कारण काय?

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांशी संलग्न असलेल्या सर्व सेवा संघातून मोठ्या प्रमाणावर रक्कम घेण्यात आली आहे. ही रक्कम संबंधित मंडळाकडे मागील अनेक वर्षांपासून थकीत आहे. सध्या कारखान्यावर सुमारे 600 कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीचा एक भाग म्हणून कारखान्याने थकबाकी वसुलीची मोहिम हाती घेतली आहे. थकबाकी न भरणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी ही कारखान्याने सुरू केल्याची माहिती नूतन संचालक अभिजीत पाटील यांनी दिली.

माजी अध्यक्षांनाही नोटीस

निवडणुकांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्या ताब्यात होता. मात्र, निवडणुकीनंतर चित्र बदलले आहे. कारखान्याचा पदभार स्विकारताच थकीत रक्कम वसुलीसाठी अभिजीत पाटील यांनी जवळपास 400 लोकांना नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष सुळे यांच्यासह माजी संचालकांचा समावेश आहे.

पंढरपूरच्या राजकारणात खळबळ

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भालके आणि पाटील गटांमध्ये चुरसीची लढत झाली होती. यामध्ये मात्र, अभिजीत पाटील हे विजयी झाले होते. गेल्या अनेक वर्षापासून या कारखान्यावर भालके गटाचे वर्चस्व होते. यंदा मात्र परिवर्तन झाले असून त्याचे परिणामही आता पाहवयास मिळत आहेत. पदभार स्विकारताच पाटलांनी घेतलेला निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागणारा आहे. एवढेच नाहीतर तालुक्याच्या राजकारणाला वेगळ्या दिशेला घेऊन जाणारा आहे. आता नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यानंतर काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.

Follow Us