बाजार समितीचा इशारा अन् कारवाईही, अनाधिकृत कापूस खरेदी व्यापाऱ्यांना भोवली

| Updated on: Nov 28, 2021 | 3:20 PM

कापसाचे वाढलेले दर आणि होत असलेला फायदा यामुळे बाजार समितीच्या अवाहनाला व्यापाऱ्यांनी फारसे महत्व दिले नाही. पण शेगाव बाजार समितीने गेल्या आठवड्याभरात 16 व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे. एवढेच नाही तर त्यांच्याकडून 1 लाख 20 हजाराचा सेसही वसुल करण्यात आला आहे.

बाजार समितीचा इशारा अन् कारवाईही, अनाधिकृत कापूस खरेदी व्यापाऱ्यांना भोवली
कापसाच्या उत्पादनात घट झाली असली तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
Follow us on

बुलडाणा : बसस्थानक परिसरातून जशी अवैध प्रवाशी वाहतूक होते अगदी त्याप्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समितीच्या आवारातून कापसाची अवैध खरेदी हे व्यापारी करीत होते. याबाबत बाजार समितीच्या सभापतींनी वेळोवेळी पत्रक काढून अशाप्रकारे कापसाची खरेदी न करण्याचे अवाहन केले होते. मात्र, कापसाचे वाढलेले दर आणि होत असलेला फायदा यामुळे बाजार समितीच्या अवाहनाला व्यापाऱ्यांनी फारसे महत्व दिले नाही. पण शेगाव बाजार समितीने गेल्या आठवड्याभरात 16 व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे. एवढेच नाही तर त्यांच्याकडून 1 लाख 20 हजाराचा सेसही वसुल करण्यात आला आहे.

यंदा पावसामुळे कापसाचा हंगाम लांबलेला आहे. शिवाय उत्पादन घटल्यामुळे मागणी आणि दरही चांगला आहे. वाढत्या दरामुळेच खासगी व्यापारी हे बाजार समितीच्या आवारातच शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करीत होते. यासंदर्भात कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. परंतु, याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर बाजार समित्यांनी कारवाईला सुरवात केली आहे.

महसूल बुडत असल्याने कारवाईचा बडगा

बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्राच्या माध्यमातून कापूस खरेदी केली जात आहे. यंदा उत्पादनात घट झाल्याने कापसाचे दर वाढलेले आहेत. सध्या 8 हजार 500 रुपये क्विंटल दर आहे. शिवाय यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतकऱ्यांची सोय व्हावी तसेच वेळेत पैसे मिळावे याअनुशंगाने खरेदी केंद्र सुरु करण्यात आली असताना खासगी व्यापारी हे बाजार समितीच्या परीसरातच कापसाची खरेदी करीत होते. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत होता. त्यामुळेच 16 व्यापाऱ्यांवर कारवाई करुन बाजार शुल्क, देखरेख शुल्क, असा सेस वसूल करण्यात आला.

शेतकऱ्यांची फसवणूकीचाही धोका

कापसाचा पुरवठा कमी आणि मागणी अधिक यामुळे दर वाढतच आहेत. खासगी व्यापारी हे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. कारण यापुर्वी असे प्रकार हे घडलेले आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडून जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर बाजार समितीही काही करु शकत नाही. कारण त्यांना खरेदीचा परवानाच नसतो. परवानाधारक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर बाजार समिती त्यावर कारवाई करुन शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देऊ शकते.

खासगी व्यापाऱ्यांकडून मापातही पाप

सध्या कापसाला अधिकचा दर आहे. त्यामुळे कोण कसा फायदा करुन घेईल हे सांगता येत नाही. गेली चार महिन्याची मेहनत, निसर्गाशी दोन हात करुन जोपासलेल्या कापसाची विक्री दरम्यान शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. थेट वजनातच काटा मारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही खरेदी केंद्र किंवा बाजार समितीच्या आवारातील परवानाधारक व्यापाऱ्यांकड़ेच कापसाची विक्री करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

फळांच्या ‘राजा’ लाही अवकाळीचा तडाखा , हापूसचा हंगाम यंदा केवळ तीनच महिने

तोडणी सुरु असतानाच शॉर्ट सर्किटमुळे जळाला उसाचा फड, बुलडाणा जिल्ह्यातील दुर्देवी घटना

16 वर्षानंतर महाबळेश्वरात बहरली ‘सुपुष्पा’ वनस्पती, संवर्धनाच्या अनुशंगाने दोन पॉईंट पर्यटकांसाठी बंद