अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा नागपुरी संत्र्याला फटका; इतक्या कोटी रुपयांचे नुकसान

आधीच खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, होत्याचं नव्हतं झालंय.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा नागपुरी संत्र्याला फटका; इतक्या कोटी रुपयांचे नुकसान
| Edited By: | Updated on: Mar 20, 2023 | 11:46 AM

नागपूर : नागपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेकडो एकरवरील पिकांचं नुकसान झालंय. गहू, हरभरा, संत्रा, भाजीपाला पिकं अक्षरशः मातीमोल झालीय. त्यामुळं या अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. संत्र्याला आलेला आंबिया बहार गळून पडलाय. गारपिटीमुळं झाडावर असलेला संत्रा अक्षरशः फुटलाय. आधीच खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, होत्याचं नव्हतं झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटानं हिरावून घेतलाय.

इतक्या कोटींचे नुकसान

अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीटीमुळे विदर्भात पिकाचं १०० कोटींपेक्षा रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालंय. फळबागा, संत्रा, हरभरा, गहू, भाजीपाल्याचं सर्वाधिक नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत.

सरकारने संपावर तोडगा काढावा

अवकाळी पावसामुळे विदर्भात पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तलाठ्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे पंचनामे रखडणार असल्याचंही ते म्हणाले. सरकारने तोडगा काढावा आणि त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

तलाठ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे पंचनामे रखडले

अनिल देशमुख म्हणाले, अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे विदर्भात नुकसान झाले. लवकर पंचनामे झाले पाहिजे. तलाठ्यांनी कामबंद केल्यामुळे पंचनामे रखडले आहेत. शासनाने हस्तक्षेप करून पंचनामे केले पाहिजे.

संत्रा, मोसंबीला नुकसान झाले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट उशिरा पाठवल्यामुळे मदत मिळण्यास उशीर झाला. आठ महिन्यांपासून तो प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याला सरकारने लवकर पैसे दिले पाहिजे. कालच्या नुकसानीचेही पंचनामे व्हावेत. त्यालासुद्धा मदत झाली पाहिजे, यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा, असंही देशमुख यांनी म्हंटलं.

वातावरणात गारठा

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात शनिवारपासून वादळी वारा व दमदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. याच्या परिणाम म्हणून गोंदिया जिल्ह्याचा पारा चांगलाच घसरला. रविवारी जिल्ह्याचे कमाल तापमान थेट 26 अंशांवर आले होते. शिवाय रविवारीही दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस असेच वातावरण राहणार असे दिसून येत आहे.

Follow Us