Budget 2021 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ‘वाटाण्याच्या अक्षता’, विरोधकांचा हल्लाबोल

| Updated on: Feb 01, 2021 | 2:37 PM

अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. खास करुन या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय.

Budget 2021 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता, विरोधकांचा हल्लाबोल
Follow us on

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाच्या अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. खास करुन या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. विरोधी राज्यांना आर्थिक त्रास कसा द्यावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा अर्थसंकल्प असल्याची टीका मुश्रीफ यांनी केली आहे.(Opposition leaders criticize the central government’s budget)

निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचं 38 हजार कोटी रुपयांचं देणं आहे. पण हा अर्थसंकल्प म्हणजे विरोधी राज्याला कशाप्रकारे आर्थिक त्रास दिला जावा, याचं उत्तम उदाहरण आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता त्या राज्यांसाठी आर्थिक लयलूट केली आहे. राजकीय हेतू समोर ठेवत हा अर्थसंकल्प सादर केला गेलाय. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटलंय.

सरकारी संस्था विकून आत्मनिर्भर बनायचं का? – थोरात

केंद्रीय अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारतवर जोर देण्यात आला आहे. पण सरकारी संस्था विकून आत्मनिर्भर होणार आहोत का? असा सवाल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे. देश विकू देणार नाही असं मोदी म्हणायचे पण आता त्यांनीच देश विकायला काढला आहे. काही राज्यांमधील निवडणुका जिंकण्यासाठी हा अर्थसंकल्प असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. नाशिक मेट्रोसाठी निधी दिला पण तो अपुरा आहे. महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात काहीच दिसत नाही. केंद्राला सर्वात जास्त कर महाराष्ट्र देतो. पण महाराष्ट्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी चांगली दिसत नाही. मुंबईतून सगळ्यात जास्त जीएसटी गोळा होतो पण मुंबईलाही काही दिलं नाही. अत्यंत निराशाजनक असा हा अर्थसंकल्प असल्याची टीका थोरात यांनी केली आहे.

अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय- भुजबळ

अर्थसंकल्पाचा डोलारा हा महाराष्ट्रावर अवलंबून आहे. पण मी अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय, अशी खोचक टिप्पणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत. नाशिक आणि नागपुरात भाजपची सत्ता असल्यामुळे मेट्रोसाठी निधी दिला. हे पटणारं नाही. यापुढे त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही. मुंबईची मेट्रो का अडकून ठेवली? जमीन केंद्राची आहे म्हणतात. ही जमीन काय मंगळावरुन आणली आहे का? असा सवाल भुजबळ यांनी केंद्र सरकारला केला आहे. काही राज्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन निधी वाटप केला आहे का? हा देशाचा अर्थसंकल्प होता की कुण्या पक्षाचा? असा प्रश्नही भुजबळ यांनी विचारला आहे.

संबंधित बातम्या :

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

Union Budget 2021 | सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा : यशोमती ठाकूर

Budget 2021 : होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आणखी एक वर्ष व्याजावर दीड लाखांची अ‍ॅडिशनल सूट मिळणार

Opposition leaders criticize the central government’s budget