LPG Price Hike: अजून भडकणार एलपीजी गॅसची किंमत? खिसा होणार खाली? केंद्र सरकारच्या उत्तराने धडकी
LPG Price Hike: गेल्या तीन महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 90 रुपयांची वाढ झाली आहे. तर आता पुन्हा दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने याविषयी मोठे संकेत दिले आहेत. काय म्हणाले केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी?

LPG Price Hike: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाचे ढग अजूनही कायम आहेत. त्याचा फटका भारताला बसला आहे. महागाई भडकली आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर त्यापाठोपाठ गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. मार्च महिन्यात 60 रुपये तर आता 29 रुपयांनी गॅस दरवाढ झाली आहे. तीन महिन्यांचा विचार करता जवळपास 90 रुपयांची वाढ झाली आहे. पण दरवाढ थांबलेली नाही. तर सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तुमच्या खिशावर पुन्हा दरोडा पाडण्याची शक्यता आहे.
सरकारचे मोठे स्पष्टीकरण
केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होऊ शकते. गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्याने दुःख होत आहे. पण सरकारवर टीका करण्यापूर्वी जगात गॅस सिलेंडरच्या काय किंमती आहेत हे सुद्धा तपासणे आवश्यक आहे. सध्या संपूर्ण जगच गंभीर संकटाचा सामना करत आहे. जगभरात मालाची वाहतूक आणि पुरवठा प्रभावित झाला आहे. एलपीजीचाही पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे पुरवठा आणि किंमतींवर मोठा दबाव आहे.
सरकारला सर्वसामान्यांची काळजी
माल वाहतूकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गॅसची मूळ किंमतही वाढली आहे. याशिवाय माल वाहतुकीसाठी मोठा कालावधी लागत आहे. आता 40-45 दिवस लागत आहेत. त्यामुळे विमा खर्चही वाढला आहे. सर्वसामान्यांविषयी सरकारलाही काळजी आहे. पण सध्याची परिस्थिती पाहात गॅसच्या किंमतीत वाढ करणे ही सरकारची अपरिहार्यता असल्याचे मंत्री प्रह्लाद जोशी म्हणाले.
तीन महिन्यातच मोठी वाढ
7 जून, रविवार घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 29 रुपयांनी वाढली. तर त्यापूर्वी 7 मार्च रोजी 14.2 किलो सिलेंडर 60 रुपयांनी महागला होता. म्हणजे तीन महिन्यात जवळपास 90 रुपयांनी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. दिल्लीत 14.2 किलो सिलेंडरची किंमत 942 रुपये इतकी झाली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरने महागाईचा उच्चांक मोडला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्याने आणि मध्यंतरी पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक ढाबे, हॉटेल्स बंद पडल्या आहेत. तर काहींनी पर्यायी इंधनाचा मार्ग स्वीकारला आहे. व्यापारी आणि अन्न उद्योग साखळीला याचा मोठा फटका बसला आहे. खानावळींचे दर वाढल्याने विविध शहरातील विद्यार्थी, चाकरमानी यांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे.