FASTag आणि टोल नाके विसरुन जा, सॅटेलाईट टोलची सुविधा कधी सुरु होणार?

Satellite Toll : आता टोल नाके आणि फास्टॅग इतिहास जमा होणार आहे. केंद्र सरकार टोल नाक्यावरील रांगच नाही तर टोल नाके हटविण्याच्या तयारीत आहे. पण याचा अर्थ तुमची टोलमधून मुक्तता होईल असा नाही. तर फास्टॅगऐवजी नवीन टोलवसुली यंत्रणा तिची जागा घेणार आहे.

FASTag आणि टोल नाके विसरुन जा, सॅटेलाईट टोलची सुविधा कधी सुरु होणार?
देशात लवकरच उपग्रहआधारे टोलवसुली यंत्रणा
| Updated on: Mar 30, 2024 | 5:02 PM

देशात गुळगुळीत आणि सुपरफास्ट रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग, द्रूतगती महामार्ग, समृद्धी असे अनेक महामार्ग जनतेच्या दिमतीला आले आहेत. त्यामुळे इंधन आणि वेळेची मोठी बचत होत आहे. या रस्त्यावरुन प्रवास करण्यासाठी नागरिकांना टोल द्यावा लागतो. सध्या फास्टॅगच्या माध्यमातून ही वसूली होते. त्यासाठी मोठं मोठे टोल नाके उभारण्यात आले आहे. पण केंद्र सरकार फास्टॅग आणि हे टोलनाके लवकरच गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. याचा अर्थ तुमचा टोल माफ होणार नाही तर नवीन टोलवसुली यंत्रणा लागू होणार आहे.

टोल नाके हटविण्यात येतील

टोलनाक्यावर टोल वसुलीसाठी लांबच लांब रांगा लागतात. फास्टॅगचा वापर होत असला तरी कोड स्कॅनिंगसाठी वेळ लागतोच. तसेच टोल नाके, कर्मचारी यांचा खर्चही मोठा आहे. कंत्राटदाराला हा ताप असतो. पण यासर्व प्रक्रियेला ब्रेक लागणार आहे. देशात लवकरच सॅटेलाईट टोल सिस्टिम सुरु होणार आहे. त्याआधारे तुम्ही वाहनातून प्रवास करत असतानाच ठराविक अंतरानंतर तुमचा टोल कापण्यात येईल. सॅटेलाईट यंत्रणेच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण होईल.

या ठिकाणी प्रयोग

सॅटेलाईन टोल वसुली कशी करावी, त्यातील अडचणी काय, तसेच ही प्रक्रिया सुलभ आणि सुकर कशी करता येईल, यासाठी देशातील तीन ठिकाणी याविषयीचा प्रयोग सुरु आहे. बंगळुरु, म्हैसूर आणि पानिपत येथे पायलेट प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. याच वर्षात 2024 मध्ये देशभरात ही पद्धत लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याविषयीची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

जितका प्रवास तितकेच पैसे

नागपूरमध्ये एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपग्रहआधारीत टोल वसुली यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामाध्यमातून थेट तुमच्या खात्यातून पैसे कपात होतील. वाहनधारक जितका प्रवास करेल. त्या अंतरात ठराविक ठिकाणी हा टोल कापण्यात येईल. जितका प्रवास तितकी रक्कम मोजावी लागणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. यामुळे इंधनाची आणि वेळेची बचत होणार आहे.