Stock Market Crash: शेयर मार्केटमध्ये महाभूकंप, एका क्षणात सगळं कोसळलं; पण फटका कुणाला? तुमच्या पैशाचं काय झालं? घ्या जाणून
Stock Market Crash: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन टेड्रिंग अंतर्गत एसटीटी करात वाढ करण्याची घोषणा करताच बाजारात महाभूकंप झाला. एका क्षणात सगळं कोसळलं. 16 लाख कोटी बुडाले, पण याचा फटका नेमका कुणाला बसला? तुमच्या पैशाचं काय झालं, घ्या जाणून...

Stock Market Crash on Budget 2026 Day: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एसटीटी करात वाढीची घोषणा केली आणि शेअर बाजारात एकच हाहाकार उडाला. फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगचं वेड असणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला. शेअर बाजारात महाभूकंप आला. एका क्षणात बाजारात पत्त्यासारखा कोसळला. गुंतवणूकदारांचे 16 लाख कोटी बुडाले, पण याचा फटका नेमका कुणाला बसला? तुमच्या पैशाचं काय झालं, घ्या जाणून…
गुंतवणूकदारांच्या खिशावर भार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली. शेअर बाजारातील फ्युचर्स आणि ऑप्शन ट्रेडिंगवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये (STT) वाढ केली. गेल्यावेळी, अर्थसंकल्पात या करात वाढ करण्यात आली होती. यंदा पण वाढीचा सांगावा आला. फ्युचर्सवरील एसटीटी 0.02 टक्क्यांहून 0.05 टक्क्यापर्यंत वाढवला गेला आहे. तर ऑप्शनवरील STT आता 0.1 टक्क्यावरून 0.15 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला. यामुळे गुंतवणूकदारांना व्यापारी सत्रात ट्रेडिंगचा खर्च वाढणार आहे. या एका घोषणेने शेअर बाजाराला मोठा हादरा बसला. अचानक मोठी घसरण झाली.
फटका कुणाला?
आज रविवारी, 1 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. त्याचा फटका ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारा दोघांनाही बसला. अनेक वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल आणि आजच्या दिवशी तो या कंपनीचे शेअर विक्री करून पैसे काढत असेल तर त्याला बाजार घसरल्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे.
उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराकडे Waaree Energies चे शेअर्स असतील आणि त्याने ही गुंतवणूक अनेक दिवस कायम ठेवली असेल. पण आज जर त्याने हे शेअर विक्री केले तर शेअरच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा फटका या गुंतवणूकदाराला सहन करावा लागेल. त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 3-4 टक्क्यांनी कमी झालेले असल्याने त्याला हा फटका बसेल.
ट्रेडर्स, व्यापाऱ्यांवर याचा थेट परिणाम दिसतो. अल्पकालावधीत ते किंमतीतील बदल आणि अस्थिरतेचा फायदा घेत नफा कमावतात. पण ज्यावेळी बाजार कोसळतो, त्याचा त्यांनाही मोठा फटका बसतो. तर काही वर्षांसाठी, महिन्यांसाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारही बाजार घसरल्यावर त्यांच्या पोर्टफोलिओतील मूल्यात लागलीच घट अनुभवतात. त्यांनी शेअरची विक्री केली नाही तरी लागलीच कागदोपत्री (paper loss) तोटा दिसतो. पण त्यांनी अशा स्थितीत शेअर विकले तर मग त्यांना फटका बसतो. त्यांचे आर्थिक नुकसान होते.
ट्रेडर्सला मोठे नुकसान
खरं म्हणजे आज बाजारात ट्रेडर्सना प्रत्यक्षात मोठा तोटा झाला आहे. कारण त्यांनी शेअर्स खरेदी-विक्री करून पोझिशन बंद केल्या आणि त्यांना नुकसान झाले. त्यांचा तोटा झाला.
तर दुसरीकडे गुंतवणूकदारांना आज एकही रुपयाचं तसं नुकसान झालं नाही. कारण त्यांनी शेअर्सची विक्री केलेली नाही. बाजार घसरला असला तरी त्यांना प्रत्यक्ष तोटा झालेला नाही. त्यांचा हा तोटा केवळ कागदावरच आहे. त्यांच्या खिशाला झळ बसलेली नाही.
