फरार मल्ल्या लंडनमधील अलिशान बंगल्यातूनही होणार बेदखल, कर्जबुडव्या मल्ल्याला आणखी एक दणका! 

| Updated on: Jan 19, 2022 | 1:16 PM

भारतातून फरार आणि कर्ज बुडव्या मल्ल्याला लंडन मधील अलिशान बंगल्यातून बेदखल होण्याची वेळ आली आहे. ब्रिटिश न्यायालयाने स्विस बँक युबीएसला याविषयीची परवानगी दिली आहे. या बँकेचे माल्यावर 2.04 दशलक्ष पौंड कर्ज आहे. ते फेडण्यासंबंधीचा वाद कनिष्ठ न्यायालयानंतर वरिष्ठ न्यायालयात पोहचला होता. कनिष्ठ न्यायालयानंतर वरिष्ठ न्यायालयाने ही माल्याला दणका दिला. या बंगल्यात मल्ल्याची 95 वर्षांची आई राहत आहे. 

फरार मल्ल्या लंडनमधील अलिशान बंगल्यातूनही होणार बेदखल, कर्जबुडव्या मल्ल्याला आणखी एक दणका! 
विजय मल्ल्याविरोधातील सुनावणी लांबणीवर
Follow us on

भारतीय फरार आणि कर्जबुडव्या विजय मल्ल्याला इंग्लंडमध्ये बेघर होण्याची वेळ आली आहे. लंडन शहरात त्याचा आलिशान बंगला आहे. मात्र कर्ज परतफेडीवर उद्भवलेल्या वादात ब्रिटिश न्यायपालिकेच्या निकालानंतर  मल्ल्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. स्विस बँक (UBS bank) आणि मल्ल्या यांच्यात कर्ज प्रकरणातून वाद उद्भवला होता. हा वाद चिघळला आणि न्यायमंदिरात पोहचला. कनिष्ठ न्यायालयात हा कायदेशीर लढा प्रदिर्घ सुरु होता. कोर्टाने मल्ल्या याला घर रिकामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानाराजीने मल्ल्याने लंडनमधील हायकोर्टाकडे दाद मागितली होती. पण त्याची आशा धुळीस मिळाली.

लंडनच्या घरातून बाहेर काढण्यात येऊ नये ही त्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. आदेशाचे पालन करण्यास बंदी घालावी ही त्याची  विनंती न्यायालयाने नामंजूर केली. परंतु लंडन उच्च न्यायालयाच्या चान्सरी विभागाचे न्यायमूर्ती मॅथ्यू मार्श  (the Chancery Division of the High Court, Deputy Master Matthew Marsh ) यांनी त्याला दणका दिला. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, मल्ल्या कुटुंबाला थकबाकी भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यास कोणताही आधार नाही. मल्ल्याने सदर स्विस बँकेकडून 2.04 दशलक्ष पौंडचे कर्ज घेतले आहे. त्याच्या परतफेडीतून त्याला अलिशान बंगला मुकावा लागणार आहे. सध्या त्याची 95 वर्षीय आई या घरात राहत आहे.

मल्ल्याची मालमत्ता विक्रीतून 792 कोटी वसूल 

गेल्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी कर्जबुडव्यांना सरकार सोडणार नसल्याचे संकेत दिले. त्यांची देशातंर्गत मालमत्ता विक्री करुन बँकांनी वसुली केल्याची माहिती त्यांनी दिली.  अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसारख्या कर्ज बुडविणाऱ्यांच्या मालमत्ता विकून बँकांनी 13,109 कोटी रुपयांची वसुली केली असून गेल्या 7 वर्षांत करार आणि इतर उपाययोजनांमधून 5.49  लाख कोटी रुपये वसूल करण्यात आले. लोकसभेत 2021-22 च्या पुरवणी अनुदान मागण्यांविषयी चर्चेदरम्यान अर्थमंत्र्यांनी बँकिंग क्षेत्र बुडीत ठेव समस्येच्या गर्तेत अडकणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय बँका सुरक्षित आहेत, बँकांमधील ठेवीदारांचा पैसा सुरक्षित आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रमुख मुद्द्यांकडे लक्ष दिले जात आहे. मल्ल्याच्या मालमत्ता विक्रीतून  आलेली रक्कम वसूल करण्यात आली आहे. बँकांनी मल्ल्याची मालमत्ता विक्रीतून 792 कोटी रुपये वसूल केले आहे.

2016 पासून देशातून परागंदा

मल्ल्यावर देशातील 17 बँकांचे कर्ज आहे. या बँकांनी उशीरा का होईना  वसुलीचा बडगा उगारला आणि कायदेशीर मार्ग अवलंबिला.  मल्ल्यावर 17 भारतीय बँकांचे 9,000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. 2 मार्च 2016 रोजी तो कायदेशीर अडचणी येताच देशातून फरार झाला. भारतीय सुरक्षा एजन्सींनी मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनच्या न्यायालयात अपील केले आणि दीर्घ लढाईनंतर ब्रिटनच्या कोर्टाने मल्ल्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या अपिलावर गेल्यावर्षी 14 मे रोजी शिक्कामोर्तब केले होते. मात्र, कायदेशीर अडचणींमुळे त्याला अद्यापही भारतात परत आणण्यात यश आले नाही. सरकारच्या भूमिकेवर विरोधी पक्षांनी टिका ही केली होती. मल्ल्याच्या  प्रत्यार्पणापूर्वी काही कायदेशीर तडजोडी झाल्या असून त्यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे वृत्त भारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाने दिले होते. ब्रिटनच्या कायद्यानुसार, सर्व प्रकरणे सोडवल्याशिवाय कोणालाही प्रत्यार्पित करता येत नाही.

संबंधित बातम्या : 

मार्केट ट्रॅकर: शेअर बाजारात घसरण, सेन्सेंक्स-निफ्टीच्या तेजीला ब्रेक; ऑटो-आयटी गडगडले

Gold Import | कोरोना काळातही सोन्याची आयात दुप्पट, भारतीय ग्राहकांची रेकॉर्डब्रेक खरेदी