महाराष्ट्राच्या वाट्याचे 15 हजार कोटी तात्काळ द्या, उद्धव ठाकरेंचं केंद्राला पत्र

| Updated on: Dec 11, 2019 | 3:01 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा जीएसटीचा वाटा मिळावा यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र पाठवलं आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याचे 15 हजार कोटी तात्काळ द्या, उद्धव ठाकरेंचं केंद्राला पत्र
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा जीएसटीचा वाटा मिळावा यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे 15 हजार 558 कोटी रुपये तात्काळ मिळावे, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.  केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 15 हजार 558 कोटी 5 लाख रुपये कर परताव्यापोटी येणे बाकी आहेत. हा परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकास कामांवर परिणाम होत आहे, असं या पत्रात म्हटले आहे. (CM Uddhav thackerays letter to Nirmala Sitharaman)

पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

2019-20 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळणारा कर परतावा 46 हजार 630 कोटी 66 लाख एवढा होता. जो की 2018-19 च्या  41 हजार 952 कोटी 65 लाख या परताव्याच्या 11.15 टक्के जास्त होता. मात्र ऑक्टोबर 2019 पर्यंत राज्याला 20 हजार 254 कोटी 92 लाख इतकीच रक्कम मिळाली.

एकंदर 6 हजार 946 कोटी 29 लाख म्हणजेच 25.53 टक्के रक्कम कमी मिळाली. अशा रितीने वाढीव अर्थसंकल्पीय रक्कमेपेक्षा कमी रक्कम राज्याला प्राप्त झाली. दुसऱ्या तिमाहीत एकूणच अर्थव्यवस्थेतील मंदी लक्षात घेता पुढील काळात देखील कर परतावा कमी मिळेल असे वाटते.

अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे 14 टक्के जीएसटी संकलनाच्या उद्दिष्टापेक्षा कमी कर संकलन झाले आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या चार महिन्यात राज्याला 5 हजार 635 कोटी रुपये इतका जीएसटी मोबदला मिळाला. मात्र नोव्हेंबर 2019 मध्ये अद्यापही 8 हजार 611 कोटी 76 लाख इतकी रक्कम जीएसटी मोबदल्यापायी मिळणे बाकी आहे.

वस्तू व सेवा कर प्रणाली 2017-18 मध्ये निश्चित करण्यात आली. त्यावेळी त्याचा आधार वित्त आयोगाचे कर परतावा सूत्र होते. मार्च 2018 या वर्षाअखेर 2019 च्या कॅग अहवाल क्र.11 नुसार एकात्मिक वस्तू व सेवा कराची समायोजित रक्कम अनेक व्यवहारांसाठी झालेली नाही असे आढळले. यामुळे या कराची मोठी रक्कम केंद्राकडून येणे बाकी आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी जेणेकरुन राज्यातील विकास कामांना वेग देता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. (CM Uddhav thackerays letter to Nirmala Sitharaman)