आधी तरुणाचे अपहरण केले, मग मारहाण, मेला समजून शेतात टाकून पळाले, पण…

दोन तरुणांमध्ये वैयक्तिक वाद होता. हा वाद टोकाला गेला. मग पुढे जे घडले ते भयंकर होते. मात्र दैव बलवत्तर म्हणून नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

आधी तरुणाचे अपहरण केले, मग मारहाण, मेला समजून शेतात टाकून पळाले, पण...
वैयक्तिक वादातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 29, 2023 | 9:29 AM

कोल्हापूर : वैयक्तिक वादातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण केल्याची घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आली आहे. मारहाणीत तरुण मृत झाला समजून तरुणाला उसाच्या शेतात फेकून पळ काढला. मात्र सतर्क नागरिकांमुळे तरुणाचे प्राण वाचवण्यास यश आले आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात ही घटना घडली. तीर्थराज उपाध्ये असे पीडित तरुणाचे नाव आहे. घटनेप्रकरणी चौघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. दरम्यान जखमी तरुणावर इचलकंरजी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जयसिंगपूर स्थानकातून तरुणाचे अपहरण

तीर्थराज हा कोल्हापूरहून रेल्वेने जयसिंगपूरला आला. जयसिंगपूरला स्टेशनला पार्क केलेली मोटारसायकल काढत असतानाच चार संशयित आरोपी तेथे आले. त्यांनी बळजबरीने तीर्थराजला गाडीत टाकून त्याचे अपहरण केले. यानंतर तीर्थराजच्या भावाने त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिसात दिली. भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहृत तरुणाचा शोध सुरु केला.

मोबाईल लोकेशनवरुन तरुणाचा शोध घेतला

पोलिसांनी तरुणाच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेतला. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला. यानंतर फरार झालेल्या आरोपींना सापळा रचून निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथून अटक केली. अनिल ऊर्फ अण्णासो राघू कजयाप्पा, चेतन बाबासाहेब बसर्गे, सुनील शिवाजी खिलारे, संतोष तात्यासाब एकोंडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

वैयक्तिक वादातून आरोपींनी केले हे कृत्य

तीर्थराज आणि अनिल अण्णासो यांच्यात वैयक्तिक वाद होता. याच वादातून अण्णासो याने मावसभाऊ चेतन बसर्गे आणि अन्य दोन मित्रांसोबत मिळून तीर्थराजचे अपहरण केले. यानंतर त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत तो मेला समजून त्याला उसाच्या शेतात टाकून आरोपींनी पळ काढला. मात्र सतर्क नागरिकांनी पाहिले अन् तरुणाचे प्राण वाचवले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.