बसण्याच्या जागेवरुन वाद, महाविद्यालयीन विद्यार्थी कॉलेजसमोरच एकमेकांना भिडले !

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव ब्रिजभान तिवारी आणि दिव्यांशु शुक्ला हे तेरावीचे विद्यार्थी असून, दोघेही ठाकूर कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिकतात. बसण्याच्या जागेवरून दोघांमध्ये वाद झाला होता.

बसण्याच्या जागेवरुन वाद, महाविद्यालयीन विद्यार्थी कॉलेजसमोरच एकमेकांना भिडले !
mumbai police
Image Credit source: TV9
| Updated on: Feb 25, 2023 | 9:00 AM

मुंबई / गोविंद ठाकूर : किरकोळ भांडणातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कॉलेजसमोरच हाणामारी झाल्याची घटना कांदिवली पूर्वेतील ठाकूर महाविद्यालयासमोर घडली. या हाणामारीत चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. ठाकूर महाविद्यालयात शिकणाऱ्या तेरावीत विद्यार्थ्यांमध्ये ही हाणामारी झाली. याप्रकरणी समता नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम 323, 324, 504, 506 (2) आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. दोन जण फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सर्व जण ठाकूर महाविद्यालयातील विद्यार्थी

दिव्यांशु शुक्ला, सौरभ शुक्ला आणि अभिषेक सिंग अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. यापैकी दिव्यांशु शुक्ला याला पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ शुक्ला आणि अभिषेक सिंग पळून जाण्यास यशस्वी झाले असून, समतानगर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी आणि पीडित एकाच महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत.

बसण्याच्या वादातून चौघांना बेदम चोपले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव ब्रिजभान तिवारी आणि दिव्यांशु शुक्ला हे तेरावीचे विद्यार्थी असून, दोघेही ठाकूर कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिकतात. बसण्याच्या जागेवरून दोघांमध्ये वाद झाला होता. शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी वैभव तिवारी हा त्याचे अन्य तीन मित्र हर्ष सिंग, अमन सिंग आणि साहिल सिंग यांच्यासह कॉलेजपासून काही अंतरावर असलेल्या पप्पू पान वाले यांच्या बेकरीसमोर उभे होते.

एकाला अटक, दोघे फरार

यावेळी दिव्यांशु, त्याचा भाऊ सौरभ शुक्ला आणि मित्र अभिषेक सिंग हे तिघे तेथे आले आणि त्यांनी तेथे उभ्या असलेल्या वैभव तिवारी, हर्ष सिंग, अमन सिंग आणि साहिल सिंग यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चौघेही जबर जखमी झाले. चौघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. संधीचा फायदा घेत सौरभ आणि अभिषेक पळून जाण्यात यशस्वी झाले, तर दिव्यांशुला पोलिसांनी अटक केली.