Rahul Gandhi : राहुल गांधींनी मर्डर केला…संसदेत एकच गोंधळ, भाजपा नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ!
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानेच सुरक्षा जवान काम करतात, असा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनीदेखील हस्तक्षेप करत पुरावे असल्याशिवाय कोणतेही आरोप करू नये. विरोधी पक्षनेते असल्याने तुमचे प्रत्येक मत रेकॉर्डवर जात आहे, असे राहुल गांधी यांना सांगितले.

Rahul Gandhi Vs Kiren Rijiju : यंदाचे संसदेचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या आंदोलनात पोलीस तसेच सुरक्षा जवानांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार, पॅलेट गनचा मारा केल्याने विरोधक चांगलेच संतापले आहेत. आज (29 जुलै) याच लाठीमारावर चर्चा झाली. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचे नाव घेत गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांच्या त्या विधानावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप व्यक्त केला. त्यामुळेच संसदेत काही वेळासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला. याच गोंधळादरम्यान, भाजपाचे नेते तथा मंत्री किरेन रिजिजू यांनी केलेल्या विधानाची सगळीकडे चर्चा होत आहे.
लोकसभेत नेमकं काय घडलं?
लोकसभेचे कामकाज चालू झाल्यानंतर दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन तसेच 20 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जच्या मुद्द्यावर वादळी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या आदेशानंतरच विद्यार्थ्यांविरधात बळाचा वापर करण्यात आला, विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला, असं गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. गृहमंत्री अमित शाहा यांनीच विद्यार्थ्यांवर फायरिंगचा आदेश दिला, असेही राहुल गांधी म्हणाले. यावरच किरेन रिजिजी यांनी आक्षेप नोंदवला.
राहुल गांधी यांनी खून केला आहे…
कोणताही ठोस आधार नसताना अशा प्रकारचे विधान करणे योग्य नाही, असे किरेन रिजिजून म्हणाले. तसेच “कोणताही पुरावा नसताना असे आरोप केले जात असतील तर मीदेखील अनेक दावे करू शकतो. राहुल गांधी यांनी खून केला आहे, असंही मी म्हणू शकतो,” असं विधान रिजिजू यांनी केले. अमित शाहा यांनी तसा आदेश दिल्याचे एखादे पत्र राहुल गांधी यांनी सादर करावे, अशी मागणीही रिजिजू यांनी केली.
लोकसभा अध्यक्षांनी सांगितला नियम
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानेच सुरक्षा जवान काम करतात, असा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनीदेखील हस्तक्षेप करत पुरावे असल्याशिवाय कोणतेही आरोप करू नये. विरोधी पक्षनेते असल्याने तुमचे प्रत्येक मत रेकॉर्डवर जात आहे, असे राहुल गांधी यांना सांगितले. दरम्यान, या सर्व आरोप-प्रत्यारोपादरम्यान विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधक जवाब दो…गृहमंत्री जवाब दो..अशी घोषणाबाजी करत होते. दरम्यान, आता लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. या विधेयकात पेपरफुटीविरोधात मोठ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
