शेवटचा क्षण मनसोक्त जगले… सेल्फी काढला, स्टेट्स ठेवला अन् दोघांनी जगाचा… ‘त्या’ रात्री काय घडलं?

| Updated on: Jun 09, 2023 | 6:24 AM

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरच्यांनी लग्नाला नकार दिला म्हणून प्रेमी युगुलांनी स्वत:ला संपवल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेवटचा क्षण मनसोक्त जगले... सेल्फी काढला, स्टेट्स ठेवला अन् दोघांनी जगाचा... त्या रात्री काय घडलं?
Lover Couple
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बाडमेर : राजस्थानच्या बाडमेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय. कुटुंबीयांना त्यांचं प्रेम मंजूर नव्हतं. पण ते दोघे एकमेकां वाचून राहू शकत नव्हते. त्यातच तिचं लग्न ठरलं. साखरपुडाही झाला. त्यामुळे दोन जीवाची घालमेल झाली. मग एक दिवस रात्री दोघेही घराबाहेर पडले. बराच वेळ एकत्र घालवला. एकमेकांना डोळेभरून पाहिलं. मनमोकळ्या गप्पा मारल्या. घट्ट मिठी मारली. पुन्हा पुढच्या जन्मी भेटण्याच्या आणाभाका घेतल्या. सेल्फी काढला. व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवला. शेवटचा क्षण मनसोक्त जगले. उजाडलं तेव्हा सर्व काही संपलं होतं. तिचा श्वास थांबलेला होता. त्याचाही श्वास बंद होता. दोघांनीही जगाचा निरोप घेतला होता. फक्त उरल्या होत्या दोघांच्या आठवणी…

बाडमेर जिल्ह्यातील मांगता गावातील ही अधुरी प्रेम कहानी आहे. नरेश कुमार यांची 19 वर्षाची मुलगी खुशी आणि बाबूलाल यांचा 21 वर्षाचा मुलगा ओमप्रकाश या दोघांची ही प्रेम कहाणी. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. दोघांनीही लग्न करायचं ठरवलं होतं. सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. अनेक दिवस, अनेक क्षण एकमेकांसोबत घालवले होते. आता दोघे एकमेकां वाचून राहू शकत नव्हते.

हे सुद्धा वाचा

रात्रीच घर सोडले, ते कायमचे

मात्र, काही दिवसांपूर्वी खुशीच्या आईवडिलांनी तिचं लग्न ठरवलं. तिचा साखरपुडाही झाला. या घटनेमुळे दोघेही मनातून खच्चून गेले. दोघांनाही एकमेकांपासून दूर राहायचं नव्हतं. त्यांना हे लग्न मंजूर नव्हतं. अशावेळी बुधवारी रात्री दोघेही घरातून बाहेर पडले. गावातील सरकारी शाळेत पोहोचले. या शाळेत दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला. भरपूर गप्पा मारल्या. दोघांनीही प्रेमाची आठवण म्हणून सेल्फी काढला. त्यानंतर हाच सेल्फी त्यांनी व्हॉट्सअपला स्टेट्स म्हणून ठेवला.

अन् आईने हंबरडा फोडला

त्यानंतर दोघांनी सोबतच्या कपड्याच्या थैलीचा दोर तयार केला आणि झाडाला गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. इकडे दोघांच्या घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली होती. दोघेही पळून गेल्याचा त्यांना संशय होता. त्यामुळे रात्रभर शोध केला. त्यानंतर पुन्हा सकाळी दोघांचा शोध घेतला. खुशीची आई तिचा शोध घेत घेत गावच्या सरकारी शाळेजवळ आली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. शाळेच्या आवारातील झाडाला दोघांचेही मृतदेह लटकलेले दिसले. अन् खुशीच्या आईने हंबरडाच फोडला. त्यांची रडारड ऐकून गावातील लोकही घटनास्थळी दाखल झाले. त्यातील काही जणांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना घटनास्थळी पाचारण केलं.

गुन्हा दाखल तपास सुरू

पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह धोरीमन्ना रुग्णालयात पाठवले. तिथे शवविच्छेदनानंतर दोघांच्याही नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यात आले. दोघांनीही प्रेमातील नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुलीच्या आत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचं धोरीमन्ना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी लाखाराम यांनी सांगितलं.