मुंबई महानगर क्षेत्रात चार नव्या रेल्वे पोलीस ठाण्याची भर पडणार, पाहा कोणती आहेत ही पोलीस ठाणी

सध्या उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज 70 लाख प्रवासी रोज प्रवास करीत आहेत. लोकलमध्ये मोबाईल, पाकिटमारांचे पेव फुटले असून तक्रार नोंदवण्यासाठी जीआरपी पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी केली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात चार नव्या रेल्वे पोलीस ठाण्याची भर पडणार, पाहा कोणती आहेत ही पोलीस ठाणी
local train
Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 21, 2023 | 3:11 PM

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : जर सर्वकाही सुरळीत झाले तर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर आणखी चार नवीन जीआरपींची पोलीस ठाणी निर्माण होणार आहेत. सध्या तिन्ही मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून एकूण 117 रेल्वे स्थानके असून केवळ 17 रेल्वे पोलीस ठाणी अस्तित्वात आहेत. जीआरपीने राज्य पोलीस महासंचालकांना अधिक पोलीस ठाण्यांना मंजूरी द्यावी असा प्रस्ताव पाठविला आहे. डीजी कार्यालयाने हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी गृहमंत्रालयाला पाठविला आहे.

आम्ही आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि कुर्ला येथील लोकमान्य टीळक टर्मिनस अशा चार नव्या पोलिस ठाण्यांची आणि 900 पोलिस अधिकाऱ्यांच्या पदे मंजूरी करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे असे जीआरपीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडीयन एक्सप्रेसला सांगितले आहे. सध्या दोन पोलिस ठाण्यातील अंतर जादा असल्याने रेल्वे प्रवाशांना कोणताही गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यांची खूप पायपीठ होत असते.

तक्रार दाखल करायला पायपीठ करावी लागते

सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर कल्याणच्या जीआरपी पोलीस ठाण्यानंतर थेट कसारा येथे रेल्वे पोलिस ठाणे आहे. या दोन पोलिस ठाण्यातील अंतरच तब्बल 67 ते 70 किमी असून या दरम्यान 12 रेल्वे स्थानके येतात. त्यामुळे या दरम्यान गुन्हा घडल्यास प्रवाशांना इतक्या लांब अंतरावर गुन्हा दाखल करण्यास जावे लागत असते. जर कसारा अगोदर कल्याणच्या दिशेला जर एखादा गुन्हा घडला तर त्याला 67 ते 70 किमीचे अंतर कापून गुन्हा दाखल करण्यास कल्याण जीआरपी पोलिस ठाण्यात यावे लागते. कारण मधल्या अंतरावर एकही जीआरपी पोलीस ठाणे नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी सांगितले. तसेच पुण्याच्या दिशेने कल्याणनंतर पुढील पोलीस ठाणे 46 किमी अंतरानंतर थेट कर्जत रेल्वे स्थानकात आहे.

नागरिक तक्रारी दाखल करीत नाहीत

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली जीआरपी पोलीस ठाणे आणि वसई जीआरपी पोलीस ठाण्यातील अंतर 17 किमी आहे. मीरारोड आणि भाईंदर येथे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढल्याने येथील गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढले असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्यांची नोंद होत नाही. लांब अंतर असल्याने नागरिकांकडून गुन्हे दाखल केले जात नाहीत त्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे. त्यामुळे दर तीन रेल्वे स्थानकांनंतर एक जीआरपीचे पोलीस ठाणे असावे असे समीर झव्हेरी यांनी म्हटले आहे.

14,650 गुन्हे दाखल

अधिक पोलीस ठाण्यांमुळे अधिक पोलीस रेल्वे स्थानकांवर दिसतील त्यामुळे पाकिटमार आणि मोबाईल चोरांना दहशत बसेल असे त्यांनी सांगितले. पिडीतांप्रमाणे पोलिसांना लांब अंतरापर्यंत तपास करायला जावे लागत असते अशी माहीती जीआरपी पोलिसांनी दिली आहे. मुंबई रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील 17 रेल्वे पोलिस ठाण्यात गेल्यावर्षी जवळपास 14,650 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील एकट्या कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यातच 1,920 गुन्हे दाखल झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us