Kalyan Crime : जुन्या वादाची जखम ठसठसत होती, नातेवाईकांसमोरच तरूणीला बेदम मारहाण

जुन्या वादातून मारहाणीचा हा भीषण प्रकार घडला. विसर्जनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने उत्साहाल गालबोट लागले. याप्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे

Kalyan Crime : जुन्या वादाची जखम ठसठसत होती, नातेवाईकांसमोरच तरूणीला बेदम मारहाण
| Updated on: Sep 27, 2023 | 1:18 PM

कल्याण | 27 सप्टेंबर 2023 : गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभरात दिसत असून आता सर्वत्र बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी सात दिवसांसाठी घरी आलेल्या बाप्पाला वाजत गाजत निरोप देत सोमवारी त्याचे विसर्जन करण्यात आले. कल्याणमध्येही विसर्जनाचा उत्साह पहायला मिळाला . मात्र एका अनुचित घटनेने सणाला गालबोट लागले. जुन्या वादातून काही तरूणांच्या टोळक्याने एका तरूणीला बेदम (girl beatn by men) मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली.

धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या तरूणीचे नातेवाईक तिथे उपस्थित होते, तरीही तरूणांना मागे-पुढे काहीच न पाहता त्या तरूणीवर हल्ला (attack) चढवला. तिच्यावर चाकूनेही हल्ला केला. या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी 7 ते 8 जणा विरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

तिथे नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली असे पीडित तरूणीचे नाव असून ती २० वर्षांची आहे. सोमवारी रात्री अंजली ही तिच्या नातेवाईकांसोबत गणपती विसर्जनासाठी कल्याण पूर्व भागातील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ गावातील तलावावर आली होती. बाप्पाला निरोप देताना आरती म्हणत, गणरायाच्या नावाचा जयघोष करण्यात ते सर्वजण व्यस्त होते. विसर्जन झाल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास अंजली आणि तिचे नातेवाईक हे सर्वजण चालत चालत घराच्या दिशेने निघाले होते.

त्याचवेळी समोरून काही तरूणांचे टोळकं येत होतं. त्यांचा व अंजलीचा खूप जुना वाद होता. काही कारणावरून त्यांच्यात चांगलच वाजलं होतं. हाच राग मनात ठेवून तरूणांचं ते टोळकं समोर आलं. आरोपी सैफ अली खान, राम तिवारी, स्काय गुलाम, सत्यम, भावेश आणि विशाल आणि त्यांच्या साथीदारांनी अंजलीला रस्त्यातच अडवलं. तिला जाब विचारच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. एवढेच नव्हे तर त्या सर्वांनी मिळून त्या एकट्या मुलीवर हल्ला करत बेदम मारहाण केली. हे सर्व पाहून तिचे नातेवाईक हादरले. पण आपल्याच नात्यातील मुलीला मारहाण होते हे बघून ते तिच्या बचावार्थ पुढे आले. त्याचवेळी टोळक्यातील एका बदमाषाने तिला बेदम मारहाण करतानाच तिच्यावर चाकूने वार केला.

या हल्ल्यात अंजली गंभीर जखमी झाली. हे पाहून तरूणांच्या त्या टोळक्याने तेथून पळ काढला. अंजलीला रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार करण्यात आले. या हल्ल्याप्रकरणी आणि मारहणाीप्रकरणी अंजलीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी 7 ते 8 जणा विरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.