अश्शी बायको नको गं बाई! पत्नीकडून माझा छळ, एकट्या औरंगाबादेत 285 नवऱ्यांच्या तक्रारी

| Updated on: Mar 03, 2022 | 9:14 AM

बायका नवर्‍यांच्या छळ करत असल्याच्या तब्बल 285 तक्रारी औरंगाबादमध्ये दाखल झाल्या आहेत. पत्नीने केलेल्या छळाच्या इतक्या प्रमाणात तक्रारी गेल्या वर्षभरात महिला सहाय्य कक्षाकडे नोंदवण्यात आल्या आहेत.

अश्शी बायको नको गं बाई! पत्नीकडून माझा छळ, एकट्या औरंगाबादेत 285 नवऱ्यांच्या तक्रारी
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

औरंगाबाद : पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला अनेक महिलांना बळी पडावं लागतं. घरगुती हिंसाचाराच्या (Domestic Violence) अनेक तक्रारी पोलिसात दाखल आहेत, मात्र कित्येक तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्याही नसतील. या वास्तवाची दुसरी बाजू दाखवणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बायकांकडून होणाऱ्या नवरोबांच्या छळाची (Husband Wife). पत्नी पतीचा छळ करत असल्याच्या तब्बल 285 तक्रारी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad) दाखल झाल्या आहेत. हा आकडा फक्त गेल्या वर्षभरातील आहे. त्यामुळे बायको-सुनांवरील अत्याचाराच्या घटना उजेडात येत असताना नवऱ्यांवरही अन्याय-अत्याचार वाढत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे नवरा-बायकोमध्ये तक्रारी आणि वादाचे प्रमाण वाढल्याचं बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण?

वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावे यासाठी वडाच्या झाडाला सात फेरे मारण्याची परंपरा आहे. मात्र राज्याच्या काही भागात वडाला उलटे फेरे मारुन पत्नीपासून सुटका करण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या नवऱ्यांच्या बातम्याही अलिकडच्या काळात येऊ लागल्या आहेत. पुरुष हक्क संरक्षण समितीने अशा पतींसाठी पुढाकार घेतला आहे. गंमतीचा भाग सोडला, तर काही पतीदेवांना आपल्या बायकोचा जाच होत असल्याचं धक्कादायक सत्य उघडकीस आलं आहे.

आकडा काय सांगतो?

बायका नवर्‍यांच्या छळ करत असल्याच्या तब्बल 285 तक्रारी औरंगाबादमध्ये दाखल झाल्या आहेत. पत्नीने केलेल्या छळाच्या इतक्या प्रमाणात तक्रारी गेल्या वर्षभरात महिला सहाय्य कक्षाकडे नोंदवण्यात आल्या आहेत. महिलांवर अन्याय-अत्याचार होत असताना आता नवऱ्यावरही अन्याय-अत्याचार वाढले आहेत.

पत्नीवरील अत्याचारही सुरुच

अर्थात, महिलांवरील घरगुती हिंसाचाराचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. पतींच्या तक्रारींच्या तुलनेत पत्नींनी केलेल्या तक्रारीही अजूनही जास्तच आहेत. किंबहुना पाच ते सहापटच आहेत. कारण बायकांनी आपल्या पतीविरुद्ध केलेल्या 1794 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मोबाईलमुळे नवरा-बायकोमध्ये तक्रारी आणि वादाचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या :

लव्ह मॅरेज असून सुद्धा नात्यात गोडवा टिकत नसेल तर प्रत्येक पार्टनरने जाणून घ्यायला हव्यात काही टिप्स, तुटलेले नाते पुन्हा जुळेल!!

काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात, दाम्पत्यातील वादावर हायकोर्टही संतापलं

नियतीही तोडू शकली नाही 65 वर्षांची संसारगाठ, पती निधनानंतर दीड तासात पत्नीचाही अखेरचा श्वास