एक कुठं? तुला तर 4-5 गर्लफ्रेंड लागतात… व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवून नवविवाहितेची धरणात उडी; आणखी गंभीर आरोप काय?

"माझं लोकांना एकच सांगणं आहे की तुमच्या मुलीचे लग्न खूप विचारपूर्वक करा. जर तुम्हाला तिचे आयुष्य नरक बनवायचे असेल तरच तिचं लग्न लावा आणि जर तुम्हाला तिचे आयुष्य महानरक बनवायचे असेल तर तिचे लग्न माझे पती अभिषेकसोबत करा." धरणात उडी मारण्यापूर्वी नवविवाहितेने तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर असा मेसेज लिहीला होता.

एक कुठं? तुला तर 4-5 गर्लफ्रेंड लागतात... व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवून नवविवाहितेची धरणात उडी; आणखी गंभीर आरोप काय?
व्हॉट्सअप स्टेट्स ठेवून नवविवाहितेची धरणात उडी
Image Credit source: social media
| Updated on: Mar 26, 2025 | 11:04 AM

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका नवविवाहित महिलेने भदभदा पुलावरून धरणाच्या खोल पाण्यात उडी मारून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा भयानक प्रकार घडला आहे. हुंड्यासाठी छळ आणि पतीच्या वाईट वागणुकीला कंटाळून महिलेने जीव देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण कमला नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी उशिरा नवविवाहित वधूने भदभदा धरणात उडी मारली, त्यानंतर स्थानिक लोकांनी धाव घेत पोलिसांना कळवलं.

घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. ती तरूणी खोल पाण्यात बुडाण्यापूर्वी तिला वाचवून बाहेर काढण्यात आलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू असल्याचे समजते.

धरणात उडी मारण्यापूर्वी लिहीलं व्हॉट्सॲप स्टेटस

मात्र धरणात उडी मारण्यापूर्वी नवविवाहितेने तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक भावनिक संदेश लिहिला होता, ज्यामध्ये तिने पती अभिषेकवर गंभीर आरोप केले होते, असे तपासात समोर आले आहे.

“माझं लोकांना एकच सांगणं आहे की तुमच्या मुलीचे लग्न खूप विचारपूर्वक करा. जर तुम्हाला तिचे आयुष्य नरक बनवायचे असेल तरच तिचं लग्न लावा आणि जर तुम्हाला तिचे आयुष्य महानरक बनवायचे असेल तर तिचे लग्न माझे पती अभिषेकसोबत करा.” धरणात उडी मारण्यापूर्वी नवविवाहितेने तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर मेसेज लिहीला होता.

“भावा, मला कधी काही झालं तर माझ्या नातेवाईकांना एक कप चहा सुद्धा देऊ नकोस, कोणाला बोलावू देखील नका. हे लोक आले तर माझ्या आत्म्याला आणखी त्रास होईल. मला कधीच शांती मिळणार नाही. यापेक्षा 11 भुकेल्या लोकांना जेवण देणं चांगलं आहे.” असंही तिने पुढे लिहीलं होतं.

पतीवर केले अनेक आरोप

जीव देण्याचा प्रयत्न केलेल्या त्या नवविवाहितेने तिच्या पतीवर इतर मुलींसोबत अफेअर असल्याचा आणि सतत छळ केल्याचा आरोप केला. स्टेटसमध्ये तिने लिहीलंकी की, “अभि जी (पती अभिषेक) तुम्हाला माझे प्रेम कधीच समजले नाही, मी रडत राहिले आणि तुम्ही मला रडताना पाहून हसत राहिलात.मी तुम्हाला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला , पण तुम्ही इतर मुलींमध्ये अडकला होतात, मला वाटलं आज नाही तर उद्या, कधीतरी तुम्ही सुधाराल, तुम्हीच माझं शेवटचं प्रेम आहात, पण मी ज्या दिवशी तुमच्यापासून दूर जाईन, त्याच दिवशी तुम्ही दुसरं लग्न कराल. आज आई दुसऱ्या लग्नाचा विषय काढते तर मला रडायला येत, पण तुमचं तसं नाही, तुम्हाला एक कुठं? तुला तर 4-5 गर्लफ्रेंड लागतात’, अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून महिलेचा पती अभिषेक याची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात हुंड्यासाठी छळ आणि घरगुती कलह हे या घटनेचे प्रमुख कारण मानले जात आहे. महिलेचा जबाब आणि पुराव्याच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल, असे कमला नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी सांगितले.