Central Railway : मध्य रेल्वेवर ‘ऑपरेशन अमानत’; आरपीएफने सहा महिन्यांत दोन कोटींचे सामान प्रवाशांना केले परत

| Updated on: Jul 30, 2022 | 2:47 AM

689 प्रवाशांपैकी 354 प्रवाशांचे 1.17 कोटी रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत देण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

Central Railway : मध्य रेल्वेवर ‘ऑपरेशन अमानत’; आरपीएफने सहा महिन्यांत दोन कोटींचे सामान प्रवाशांना केले परत
रेल्वेची माउंट नन पर्वतारोहण मोहीम
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन अमानत’ (Operation Amanat) अभियानाला चांगले यश लाभले आहे. आरपीएफने जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत 1 कोटी 89 लाख रुपये किमतीचे सामान प्रवाशांना परत (Return) केले आहे. रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त ‘ऑपरेशन अमानत’ या विशेष अभियानांतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन प्रवाशांना त्यांचे गहाळ झालेले सामान परत मिळवून देण्यास मदत केली आहे. प्रवाशांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख इ.यांसारख्या मौल्यवान वस्तू प्रवाशांना परत मिळवून देण्यात आल्या आहेत.

जानेवारी ते जून दरम्यान प्रवाशांना मौल्यवान ऐवज परत मिळवून दिला

रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) कर्मचारी नेहमीच सतर्क असतात. रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी ते चोवीस तास जागरुक राहतात. त्याचबरोबर जीव वाचवणारे, पळून आलेल्या मुलांना वाचवणारे, सामान शोधून काढणारे आणि रेल्वेमार्गे अंमली पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवणारे अशी विविधांगी ओळख आरपीएफने जपली आहे. याचदरम्यान आरपीएफकडून ‘ऑपरेशन अमानत’ या अभियानामध्येही चांगला परफॉर्मन्स दाखवण्यात आला आहे. चालू वर्षात जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत आरपीएफने सुमारे 1.89 कोटी रुपयांचे सामान प्रवाशांना परत मिळवून दिले आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची सरशी

689 प्रवाशांपैकी 354 प्रवाशांचे 1.17 कोटी रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत देण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. इतर विभागांत परत मिळवलेल्या प्रवाशांच्या सामानाचे मूल्य पुढीलप्रमाणे आहे. भुसावळ विभागातील 143 प्रवाशांचे 28.29 लाख किमतीचे सामान, नागपूर विभागात 81 प्रवाशांचे 19.14 लाख रुपयांचे सामान, पुणे विभाग 73 प्रवाशांचे 15.04 लाखाचे सामान प्रवाशांना परत मिळवून देण्यात आले आहे. तसेच सोलापूर विभागातील 38 प्रवाशांचे 9.38 लाख किमतीचे सामान देण्यात आले आहे. 2021 मध्ये देखील आरपीएफने 666 प्रवाशांचे 1.65 कोटी रुपयांचे सामान परत दिले आहे. यापैकी 383 प्रवाशांचे 1.01 कोटी रुपयांचे साहित्य मुंबई विभागातूनच वसूल करण्यात आले आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या या शूर सैनिकांच्या कार्याचा सारांश सुरक्षा, सतर्कता आणि सेवा असा करता येईल. त्यांनी अत्यंत समर्पण, सतर्कतेने आणि धैर्याने आपली कर्तव्ये पार पाडल्याचे यावरून सिद्ध होत आहे. (Central Railway RPF returned luggage worth two crores to passengers in six months)

हे सुद्धा वाचा