Kalyan : ‘हॅलो, कचरा कुंडीत बॉम्ब आहे, लवकर या!’ कल्याण पोलिसांना फोन करुन कुणी वेठीस धरलं?

| Updated on: Sep 16, 2022 | 12:17 PM

Kalyan Crime News : निलेश फड नावाच्या तरुणाने कोळसेवाडी पोलिसांना बॉम्बची माहिती देणारा फोन केला होता. पोलीस यंत्रणेला वेठीस धरल्याप्रकरणी आणि अफवा पसरवल्याचा ठपका ठेवत निलेश फड या 19 वर्षीय तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Kalyan : हॅलो, कचरा कुंडीत बॉम्ब आहे, लवकर या! कल्याण पोलिसांना फोन करुन कुणी वेठीस धरलं?
हॉटेल मालकाला धमकावणाऱ्या गुंडाला पोलिसांनी दिला चोप
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

कल्याण : कल्याणच्या कोळसेवाडी (Kolsewadi, Kalyan) परिसरात गुरुवारी बॉम्बची अफवा पसरली होती. गुरुवारी दुपारी आलेल्या एका फोन कॉलने पोलिसांची (Kalyan Police) झोपच उडवली. एका व्यक्तीने फोन करत ‘कचराकुंडीत बॉम्ब आहे, लवकर या’ असं म्हणत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. ज्या नंबरवरुन फोन आला होता, तो नंबर ट्रेस केला. अखेर ही अफवा (Rumours) असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी फोन करुन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आरोपीस अटकदेखील केली. एका 19 वर्षांच्या तरुणाने हा फोन केला होता, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय.

फोन करुन काय सांगितलं?

गुरुवारी दुपारी कोळसेवाडी पोलिसांना एक फोन आला. एका मोबाईल नंबरवरुन एका तरुणाने फोन केला आणि बॉम्ब असल्याची माहिती दिली. ‘कोळसेवाडी बाजारपेठेच्या कचरा कुंडीमध्ये बॉम्ब आहे, आजूबाजूला लहान मुलं आणि माणसं आहेत, तुम्ही लवकर या’ असं फोन केलेल्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं.

बॉम्बची माहिती देणारा फोन आल्यानं पोलिसही चक्रावून गेले होते. पोलिसांनी लगेचच तपास यंत्रणा कामाला लावली. अखेर बॉम्ब वगैरे काहीही नसल्याचं तपासात उघड झालं आणि पोलिसांनी बॉम्ब असल्याची बतावणी करणाऱ्या तरुणाला शोधून काढलं.

हे सुद्धा वाचा

LIVE Video : पाहा ताज्या घडामोडी

अफवा पसरवणारा कोण?

निलेश फड नावाच्या तरुणाने कोळसेवाडी पोलिसांना बॉम्बची माहिती देणारा फोन केला होता, अशी माहिती समोर आलीय. पोलीस यंत्रणेला वेठीस धरल्याप्रकरणी आणि अफवा पसरवल्याचा ठपका ठेवत निलेश फड या 19 वर्षीय तरुणावर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून निलेशचा मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

सध्या कल्याण पोलीस या तरुणाची चौकशी करत आहेत. नेमकं या तरुणाने असं कृत्य का केलं, याचा शोध आता घेतला जातोय. दरम्यान, गेल्या काही दिवसांत बॉम्बच्या अफवेचे फोन येण्याचे प्रकार वाढले आहेत.

महिन्याभरापू्र्वी मुंबई वाहतूक पोलिसांनाही धमकीचा फोन आला होता. त्यानंतरही एकच खळबळ उडाली होती. तर काही दिवसांपूर्वीच अमरावतीमध्येही एक संशयास्पद बॅग आढळून आल्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला होता. तर आता कल्याणमध्ये बॉम्बच्या अफवेचा फोन आल्याची घटना समोर आलीय.