#क्राईम_किस्से Divya Bharti | पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू, अभिनेत्री दिव्या भारतीचा अखेरचा दिवस कसा होता?

मुंबईतील राहत्या इमारतीच्या खिडकीतून पडून दिव्या भारतीचा अकाली मृत्यू झाला. मात्र तिने आत्महत्या केली, ती अपघाताने खाली पडली, की तिच्यासोबत घातपात झाला, हे कोडं तिच्या मृत्यूच्या 28 वर्षांनंतरही उलगडलेलं नाही आणि कदाचित हे  कायमस्वरुपी एक रहस्यच राहील.

#क्राईम_किस्से Divya Bharti | पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू, अभिनेत्री दिव्या भारतीचा अखेरचा दिवस कसा होता?
Divya Bharti
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 7:48 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये दिव्या भारतीसारखी (Divya Bharti) क्वचितच कोणी अभिनेत्री असेल, जिने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षातच 12 चित्रपट केले, जे प्रचंड हिट झाले. मात्र पुढच्याच वर्षी तिच्या आयुष्याची अखेरही झाली. दिव्या भारतीचं नाव निघताच ‘ऐसी दिवानगी’ आणि ‘सात समंदर पार’ यासारखी गाणी आठवतात, शाहरुख खानसोबत दीवाना सिनेमात तिने केलेला रोमान्स आठवतो, पण त्यासोबतच आठवते काळीज पिळवटून टाकणारी तिच्या मृत्यूची बातमी. 25 फेब्रुवारी 1974 रोजी जन्म झालेल्या दिव्या भारतीचे 5 एप्रिल 1993 रोजी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील राहत्या इमारतीच्या खिडकीतून पडून तिचा अकाली मृत्यू झाला. मात्र तिने आत्महत्या केली, ती अपघाताने खाली पडली, की तिच्यासोबत घातपात झाला, हे कोडं तिच्या मृत्यूच्या 28 वर्षांनंतरही उलगडलेलं नाही आणि कदाचित हे  कायमस्वरुपी एक रहस्यच राहील.

कोण होती दिव्या भारती?

दिव्या भारतीने 1992 मध्ये ‘विश्वात्मा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याआधी तिने काही तेलुगू चित्रपट केले होते. ‘विश्वात्मा’ सिनेमातील ‘सात समंदर पार, मैं तेरे पिछे पिछे आ गयी’ हे गाणे प्रचंड गाजले. या गाण्याने दिव्याला मोठे यश मिळवून दिले. आजही ते गाणं रसिकांच्या ओठावर आहे. यानंतर, दिव्याने सलग 10 हिंदी चित्रपट केले, जे ओळीने हिट ठरले. ज्यात शोला और शबनम, दिल का क्या कसूर, जान से प्यारा, दीवाना, बलराम, दिल ही तो है, दिल आशना है, गीत सारख्या सिनेमांचा समावेश आहे. वर्षभरातच तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. ती त्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्रीही ठरली होती.

साजिद नाडियाडवालाशी विवाह

दिव्या भारती जेव्हा शोला और शबनम सिनेमाचे शूटिंग करत होती, तेव्हा चित्रपटाचा नायक गोविंदाने तिची ओळख आपला मित्र दिग्दर्शक-निर्माता साजिद नाडियाडवालाशी करुन दिली होती. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 10 मे 1992 रोजी दोघांनी लग्न केलं. मात्र तिची बहरती चित्रपट कारकीर्द लक्षात घेत लग्नाचा फारसा गाजावाजा करण्यात आला नाही. दिव्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचं नाव सना नाडियाडवाला असं ठेवण्यात आलं. 1993 मध्ये दिव्याचे फक्त तीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते. क्षत्रिय, रंग आणि शतरंज. कारण हे दिव्याच्या आयुष्यातील शेवटचं वर्ष होतं. यापैकी दोन सिनेमा तर तिच्या मृत्यूनंतर रिलीज झाले. कारण लग्नानंतर जेमतेम वर्षभरातच तिने जगाचा निरोप घेतला.

मृत्यूच्या कारणांचा उहापोह

दिव्याच्या आकस्मिक मृत्यूमागे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. कोणी याला आत्महत्या म्हणतं, कोणी हा अपघात असल्याचं सांगतं, तर काही जणांनी तिच्या पतीलाही यासाठी जबाबदार ठरवलं. दिव्याला साजिदचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याबद्दल चिंता वाटत होती. त्याच्या आईसोबतही तिचे खटके उडायचे, अशाही चर्चा रंगल्या होत्या.

बरीच वर्ष तपास करुनही पोलिस अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि 1998 मध्ये ही केस बंद करण्यात आली. पण त्या रात्री नेमकं काय झालं, दिव्याचा मृत्यू कसा झाला आणि मृत्यूच्या काही तासांपूर्वी जर दिव्या इतकी आनंदी होती, तर तिने मृत्यूला का कवटाळलं? असे अनेक प्रश्न विचारले गेले, त्यातील बहुतेक अनुत्तरितच राहिले.

त्याच दिवशी नवीन 4 बीएचके फ्लॅटची खरेदी

आपल्या मृत्यूच्या दिवशीच दिव्याने मुंबईत स्वतःसाठी नवीन 4 BHK घर विकत घेतले होते आणि करार अंतिम झाला होता. दिव्याने तिचा भाऊ कुणालला ही आनंदाची बातमी दिली होती. दिव्या त्याच दिवशी शूटिंग संपवून चेन्नईहून मुंबईला परतली होती. तिच्या पायालाही दुखापत झाली होती.

काय घडलं ‘त्या’ रात्री?

मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा भागातील तुलसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर दिव्या पतीसह राहत होती. तिच्या घरी रात्री 10 वाजताच्या सुमारास तिची मैत्रीण आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला पती श्याम यांच्यासह भेटायला आली होती. तिघं लिव्हिंग रुममध्ये बसून गप्पा मारत होते. सोबतच मद्यपानही सुरु होतं. दिव्याची मोलकरीण अमृताही गप्पांमध्ये सहभागी होती. काही मिनिटांनंतर भयंकर असं काही घडेल, याची पुसटशी कल्पनाही तेव्हा कोणाला नसावी.

दिव्या बाल्कनीत गेली आणि…

रात्रीचे अकरा वाजले होते. अमृता काहीतरी काम करण्यासाठी किचनमध्ये गेली, नीता लुल्ला तिच्या पतीसोबत टीव्ही पाहण्यात व्यस्त होती. त्याच वेळी, दिव्या हॉलच्या खिडकीच्या दिशेने गेली आणि तिथून अमृताशी मोठ्या आवाजात बोलत होती. दिव्याच्या लिव्हिंग रुममध्ये बाल्कनी नव्हती, पण ती एकमेव खिडकी होती ज्याला ग्रिल नव्हती. त्याच खिडकीखाली पार्किंगची जागा होती, जिथे बरीच वाहने उभी राहत असत.

पाचव्या मजल्यावरुन खाली पडली

त्या दिवशी तिथे एकही गाडी उभी नव्हती. खिडकीत उभी असलेली दिव्या वळली आणि तिने नीट उभं राहण्याचा प्रयत्न केला. मात्र इतक्यात तिचा पाय घसरला आणि दिव्या सरळ खाली जमिनीवर पडली, असा दावा केला जातो. पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने दिव्या पूर्णपणे रक्ताने माखली होती. तिला तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दिव्याचा मृत्यू झाला. डोक्याला झालेली दुखापत आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

पाच वर्षे तपास करूनही पोलिसांना तिच्या मृत्यूचे कोणतेही ठोस कारण सापडले नाही. परिणामी, ती दारूच्या नशेत असल्याने बाल्कनीतून खाली पडली, असे कारण पोलिसांच्या अहवालात नमूद केले आहे. दिव्याचा मृत्यू खून होता, अपघात की आत्महत्या, हे रहस्य आजपर्यंत उकललेले नाही. जर ती नाराज होती, तर तिने स्वतःसाठी घर का खरेदी केले असेल? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मग खरोखरच तिच्या पतीने हत्येचा कट रचला होता का? असंही विचारलं जायचं. या प्रश्नांची उत्तरं दिव्यासोबतच लुप्त झाली. पण काहीही असो, दिव्या भारती आजही प्रत्येक चाहत्याच्या हृदयात विराजमान आहे, हे नक्की.

संबंधित बातम्या :

Nafisa Joseph | लग्नाच्या तोंडावर गळफास, मिस इंडिया नफीसा जोसेफच्या आत्महत्येसाठी बॉयफ्रेण्डला ठरवलेले जबाबदार

Kuljeet Randhawa | पोलिसाची अभिनेत्री कन्या, कुलजीत रंधावाने तिशीतच संपवलेलं आयुष्य, सुसाईड नोटमध्ये उलगडलं कारण

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.