मैत्रिणींसमोर ‘चरसी’ म्हटल्याचा राग, कॉलेज विद्यार्थ्यांची मारहाण, नवी मुंबईत तरुणाची आत्महत्या

| Updated on: Nov 27, 2021 | 9:49 AM

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवरुन आपल्या मित्राला त्याविषयी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील न्हावा शेवा पोलिसांनी तरुणाला मारहाण करणाऱ्या बारावीतील दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मैत्रिणींसमोर चरसी म्हटल्याचा राग, कॉलेज विद्यार्थ्यांची मारहाण, नवी मुंबईत तरुणाची आत्महत्या
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड
Follow us on

नवी मुंबई : बारावीत शिकणाऱ्या दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘चरसी’ म्हटल्याबद्दल त्यांनी मारहाण केल्यामुळे कॉलेजवयीन तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्याला पुन्हा मारहाण केली जाईल, या भीतीतून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे. नवी मुंबईतील राहत्या घरी तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. वर्गमैत्रिणींसमोर चिडवल्याच्या रागातून त्याला मारहाण झाल्याची माहिती आहे.

इन्स्टाग्रामवर मित्राला सांगून आत्महत्या

धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवरुन आपल्या मित्राला त्याविषयी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील न्हावा शेवा पोलिसांनी तरुणाला मारहाण करणाऱ्या बारावीतील दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

नवी मुंबईतील उलवे भागात राहणारा संबंधित तरुण सीवूड्स येथील एका कॉलेजमध्ये इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महाविद्यालये पुन्हा खुली झाल्यामुळे त्यानेही कॉलेजला जायला सुरुवात केली होती. 12 नोव्हेंबरला तो नेहमीप्रमाणे सकाळीच महाविद्यालयात गेला होता. त्यावेळी संबंधित दोघे ‘चरसी’ असल्याचं वक्तव्य त्याने वर्गातील दोघी मैत्रिणींसमोर केलं होतं.

पुन्हा मारहाण होण्याच्या भीतीने टोकाचं पाऊल

तरुणाने कॉलेजमधील मुलींसमोर आपली हेटाळणी केल्याचं दोघा विद्यार्थ्यांना समजलं. त्यामुळे चिडून त्या दोघांनी संबंधित तरुणाला कॉलेजच्या गेटबाहेरच अडवलं आणि तसं बोलण्याचा जाब विचारला. याशिवाय त्यानंतर त्याला दोघांनी  बेदम मारहाणही केल्याचा दावा केला जातो. आपल्याला पुन्हा अशी मारहाण होईल या भीतीने तरुणाने नवी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप केला जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवरुन आपल्या मित्राला त्याविषयी सांगितलं होतं.

या प्रकरणी तरुणाला मारहाण करणाऱ्या बारावीतील दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्हावा शेवा पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

डोंबिवलीतील बाळ विक्री प्रकरण हिमनगाचं टोक, डॉ. केतन सोनीच्या आश्रमात तब्बल 71 मुलं सापडली

दारूनं घात केला, आईनं जीव दिला, वडील तुरुंगात, लेकरांच्या डोक्यावरचं छत हरपलं, बीडमध्ये दुःखद घटना!

पिंपरीतील पेट्रोल बॉम्बचे गूढ उकलले, माजी नगरसेवकाने बर्थडे केक न कापल्याच्या रागातून हल्ला