परभणीच्या कंत्राटदाराचा बायकोसह आत्महत्येचा प्रयत्न, मंत्रालयासमोरच अंगावर रॉकेल ओतलं

| Updated on: May 13, 2022 | 7:36 AM

राजू चिन्नापा मरगुंडे हे पत्नीसह मंत्रालयाच्या गेटवर आले होते. त्यानंतर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता. मरगुंडे हे डांबर कामगार कंत्राटदार आहेत.

परभणीच्या कंत्राटदाराचा बायकोसह आत्महत्येचा प्रयत्न, मंत्रालयासमोरच अंगावर रॉकेल ओतलं
मंत्रालयाबाहेर आत्महदनाचा प्रयत्न
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

मुंबई : परभणीतील (Parabhani Crime News) कंत्राटदाराने सपत्नीक आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Suicide Attempt) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई गाठून मंत्रालयाच्या (Mantralaya Mumbai) जनता जनार्दन या मुख्य प्रवेशद्वारावर त्यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून कंत्राटदार राजू चिन्नापा मरगुंडे आणि त्यांच्या पत्नीने स्वतःला जाळून घेण्याच्या दृष्टीने पावलं उचलली. गुरुवार (12 मे) रोजी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने पोलिसांनी या दोघांना वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

राजू चिन्नापा मरगुंडे हे पत्नीसह मंत्रालयाच्या गेटवर आले होते. त्यानंतर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता. मरगुंडे हे डांबर कामगार कंत्राटदार आहेत. सार्वजनिक विभागातील कर्मचारी आणि अधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. ‘दिव्य मराठी’च्या वेबसाईटवर यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे.

काय आहे मागणी?

राजू मरगुंडे उपकंत्राटदार म्हणून कामे घेतात. मूळ कंत्राटदाराने पैसे दिले नाहीत म्हणून बांधकाम विभागाने पैसे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी परभणी, नांदेड आणि मुंबईतही उपोषण पुकारले होते. त्यांची मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाली, पण पैसे मिळत नसल्याच्या कारणावरुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या मागण्यांची सविस्तर माहिती घेतली.

मंत्रालय परिसरात आत्महत्येच्या प्रयत्नांचं सत्र

याआधी, शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण चांगलंच तापलं होतं. धुळे जिल्ह्यातील विखरण येथील 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी जानेवारी 2018 मंत्रालयात विष प्राशन केले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली होती. तर एका महिलेने पोलिसांवर आरोप करत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वीच समोर आला होता.