#क्राईम_किस्से : Rinku Patil | दहावीच्या परीक्षा केंद्रातच पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, अंगावर काटा आणणारे 32 वर्ष जुने रिंकू पाटील हत्याकांड

| Updated on: Sep 13, 2021 | 11:10 AM

रिंकूसह वर्गातील सर्वांचेच चेहरे भेदरलेले दिसत होते. आरोपींनी रिंकूच्या अंगावर पेट्रोल ओतलं. रिंकूला मृत्यू डोळ्यासमोर दिसत असावा. काही क्षणातच त्यांनी काडी ओढली आणि रिंकूच्या अंगावर फेकली.

#क्राईम_किस्से : Rinku Patil | दहावीच्या परीक्षा केंद्रातच पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, अंगावर काटा आणणारे 32 वर्ष जुने रिंकू पाटील हत्याकांड
Rinku Patil
Follow us on

मुंबई : उल्हासनगरमध्ये रिंकू पाटील (Rinku Patil) नावाच्या किशोरवयीन तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती. 30 मार्च 1990 रोजी घडलेल्या या घटनेच्या वाईट स्मृती जवळपास 31 वर्षांनंतरही अनेक जणांच्या मनात कायम आहेत. रिंकू पाटीलला उल्हासनगरमध्ये दहावीच्या परीक्षा केंद्रातच पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं होतं. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या महाराष्ट्रातील घटनांची आठवण काढताना उल्हासनगरची रिंकू पाटील, सांगलीची अमृता देशपांडे ही नावं प्रामुख्याने समोर येतात.

काय आहे प्रकरण?

30 मार्च 1990 चा तो दिवस. दहावीची परीक्षा सुरु होती. परीक्षा केंद्रावरील सर्वच विद्यार्थ्यांची लगबग चालू होती. विद्यार्थ्यांच्या पालकांचीही केंद्राबाहेर गर्दी होती. विद्यार्थी, पालक, शिक्षक, पर्यवेक्षक यांनी परीक्षा केंद्राचा परिसर फुलून गेला होता. 16 वर्षांची रिंकूही परीक्षेची पूर्ण तयारी करुन आली होती. पुढील काही मिनिटात आपल्यासोबत अघटित घडणार आहे, याची पुसटशी कल्पनाही तिला नसेल.

रिंकूच्या वर्गात चौघे शिरले

इतक्यात, हातात तलवार, पिस्तूल आणि पेट्रोलचा कॅन घेऊन चौघे जण परीक्षा केंद्रात घुसले. मुख्य आरोपी हरेश पटेल याच्यासोबत अनुप प्रतापसिंग वर्मा आणि अशोक वाघ होते. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवरही त्यांनी हल्ला केला. पाहता पाहता परीक्षा केंद्रात एकच हलकल्लोळ उडाला. कोणालाही काही समजण्याच्या आतच वेगाने घडामोडी घडत होत्या. त्यानंतर एका वर्गात शिरुन चौघांनी त्याचं दार आतून बंद केलं.

रिंकू पाटील तिथेच घाबरुन उभी होती. चौघांनी तिला इतर विद्यार्थ्यांपासून बाजूला उभं केलं. रिंकूसह वर्गातील सर्वांचेच चेहरे भेदरलेले दिसत होते. आरोपींनी रिंकूच्या अंगावर पेट्रोल ओतलं. रिंकूला मृत्यू डोळ्यासमोर दिसत असावा. काही क्षणातच त्यांनी काडी ओढली आणि रिंकूच्या अंगावर फेकली. रिंकूच्या शरीराने पेट घेतला. ती जिवंतपणी जळत होती आणि काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं. जागच्या जागी तिच्या शरीराचा कोळसा झाला, अशा बातम्या त्यावेळच्या प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या.

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा जीव गेला

रिंकू पाटीलवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या 22 वर्षांच्या हरेश पटेलनं हे हत्याकांड घडवून आणलं होतं. रिंकूने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून त्याने हा सूड उगवला होता, असा आरोप केला गेला. धक्कादायक म्हणजे रिंकूच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी हरेशनेही आपलं आयुष्य संपवलं होतं. रेल्वेखाली उडी घेऊन हरेशने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं होतं.

हरेशच्या मृत्यूनंतरही रिंकू पाटील खून खटला चालला होता. रिंकूच्या हत्येत सहभाग असणारे आरोपी अनुप प्रतापसिंग वर्मा आणि अशोक वाघ यांना हत्येचे षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अनुप प्रतापसिंग वर्माचं कृत्य अत्यंत विकृत असल्याचं सरकारी पक्षाने कोर्टात म्हटलं होतं. त्यानंतर त्याला 28 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती.

संबंधित बातम्या :

एकतर्फी प्रेमातून सांगलीच्या अमृता देशपांडेची झालेली हत्या, तेवीस वर्षांनंतरही अंगावर शहारे आणणारी घटना

बॅडमिंटनपटू सय्यद मोदीची 26 व्या वर्षी झालेली हत्या, पत्नी-प्रियकर होते संशयाच्या भोवऱ्यात