मूल होत नाही म्हणून विवाहितेची हत्या, परस्पर अंत्यसंस्काराची तयारी, पोलिसांनी स्मशानभूमीतूनच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

| Updated on: Nov 18, 2021 | 6:30 PM

काही दिवसांपूर्वी हुंडा आणि मूल होत नाही म्हणून पती व सासरच्यांनी तिला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाणीमुळे महिलेची प्रकृती खालावल्याने तिला नवादा आणि नंतर पाटणा येथे उपचारासाठी नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मूल होत नाही म्हणून विवाहितेची हत्या, परस्पर अंत्यसंस्काराची तयारी, पोलिसांनी स्मशानभूमीतूनच आरोपींच्या मुसक्या आवळल्या
crime
Follow us on

नवादा : मूल जन्माला घालू शकत नाही म्हणून एका महिलेची सासरच्यांकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. नवादा जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाकरी गावात हत्या केल्यानंतर महिलेच्या मृतदेह परस्पर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार उरकण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलीस वेळेत दाखल झाले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक केली.

लग्नाला आठ वर्षे होऊनही मूल होत नव्हते

हिसुआ पोलीस स्टेशन हद्दीतील घुरिहा गावातील सुनील कुमार यांच्या मुलगी पंपी कुमारी (29 वर्षे) हिचा पाकरी गावातील शैलेंद्र सिंह यांचा मुलगा नितीश कुमार याच्यासोबत आठ वर्षांपूर्वी हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह झाला होता. लग्नाला 8 वर्षे उलटले तरी घरात पाळणा हलत नव्हता. पत्नीला मूल होत नसल्याने पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असत. तसेच सूनेला मूल होत नाही म्हणून सासरचे लोकही महिलेचा सतत छळ करायचे. मुलीचा सासरी छळ होत असल्याने तिच्या माहेरच्या लोक आणि सासरच्यांमध्येही वाद होत होते. हाच वाद मिटवण्यासाठी दोन्ही कुटुंबांमध्ये पंचायतही झाली होती.

मारहाणीमुळे महिलेची प्रकृती खालावली

काही दिवसांपूर्वी हुंडा आणि मूल होत नाही म्हणून पती व सासरच्यांनी महिलेला जबर मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या मारहाणीमुळे महिलेची प्रकृती खालावल्याने तिला आधी नवादा आणि नंतर पाटणा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी रात्रीच तिचा मृतदेह पाकरी गावात आणला. गुरुवारी मृतदेह दहनासाठी गावातील स्मशानभूमीत नेण्यात आला. महिलेच्या मृत्यूची माहिती तिच्या माहेरच्या लोकांपासून लपविण्यात आली. महिलेच्या वडिलांना याबाबत कळताच त्यांनी तात्काळ अकबरपूर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.

पती आणि सासऱ्याला स्मशानभूमीतूनच अटक

घटनेची माहिती मिळताच एसएचओ अजय कुमार आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह स्मशानभूमीतून ताब्यात घेतला. तेथून पती व सासऱ्याला अटक करण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एसएचओ अजय कुमार यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीमुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. (Murder of a married woman for not having children in bihar)

इतर बातम्या

West Bengal Triple Death: कूचबिहारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा रहस्यमयरित्या मृत्यू, हत्या की आत्महत्या? याबाबत तपास सुरु

Crime |दुर्दैवी घटना : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले , पती-पत्नीचा जागेवर मृत्यू