नागपूर : मागील वर्षात गुन्हेगारी कमी झाल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितले. मात्र या वर्षाची सुरवात हत्याच्या घटनांनी झाली. गेल्या 9 दिवसांत चार हत्येच्या घटना नागपुरात घडल्यात. या हत्यांच्या या घटनांमुळं नागपूर हादरलं आहे. यामुळं नागपूर पुन्हा क्राईम कॅपिटलकडे जात आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
गेल्या 12 तासात नागपूर शहरात दोन हत्येच्या घटना घडल्यात. त्यात एक कळमना पोलीस स्टेशन हद्दीत घडली. गाडीला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाचा खून करण्यात आला. दुसरी घटना हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. पत्नीच्या चारित्र्याबद्दल बोलल्याच्या कारणावरून एकाने दुसऱ्याची गोळी घालून हत्या केली.
दोन्ही घटनांत पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतलं. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कमाल चौक परिसरात जुन्या वादावरून राजेश मेश्राम नावाच्या युवकाची एका कारमधून आलेल्या तीन आरोपीने भरदिवसा भर रस्त्यात हत्या केली. 3 तारखेला सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत भर दुपारी चाकूने भोकसून 50 वर्षीय इसमाची हत्या करण्यात आली.
त्यामुळे नवीन वर्षात 9 दिवसांत चार हत्या झाल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र पोलीस यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगतात. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असल्याचं सांगितलं.
मागील वर्षी गुन्हेगारीचं कमी झाल्याचं ऐकून नागपूरकरांनी पोलिसांच्या कार्यशैलीच स्वागत केलं. मात्र नवीन वर्षात सुरू झालेली गुन्हेगारी आवरण्याची मोठी जबाबदारी आता नागपूर पोलिसांवर आहे. नाहीतर नागपूरला पुन्हा गुन्हेगारीच शहर अशी ओळख मिळायला वेळ लागणार नाही.