आठवडाभर बेपत्ता, चिमुकलीचा मृतदेह घरात पाण्याच्या टाकीत सापडला, तिघे नातेवाईक ताब्यात

| Updated on: Dec 27, 2021 | 9:10 AM

20 डिसेंबरपासून तीन वर्षांची बालिका बेपत्ता होती. नुकताच तिचा मृतदेह घरातील बाथरुमजवळ संशयास्पद स्थितीत आढळला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कुऱ्हा या गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

आठवडाभर बेपत्ता, चिमुकलीचा मृतदेह घरात पाण्याच्या टाकीत सापडला, तिघे नातेवाईक ताब्यात
यवतमाळमधील बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला
Follow us on

यवतमाळ : आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या तीन वर्षांच्या बालिकेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत (Missing Girl Found Dead) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनीच चिमुकलीची हत्या केल्याचा आरोप असून तिघा जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. बालिकेला आधी धान्याच्या डब्यात कोंडण्यात आले होते, त्यानंतर तिला बाथरुमजवळ आणून ठेवले असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या 6 दिवसांपासून जिल्हा पोलीस दलातील विविध पथकं तिला शोधण्यासाठी दिवसरात्र एक करत होते, अखेर तिच्याच घराच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळला.

काय आहे प्रकरण?

20 डिसेंबरपासून तीन वर्षांची बालिका बेपत्ता होती. नुकताच तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कुऱ्हा या गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. एलसीबी, फिंगर, डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक, सायबर सेल अशी सर्व पथकं रात्री घटनास्थळी दाखल झाली होती.

रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत या प्रकरणाचा तपास चालल्यानंतर चिमुकलीच्या तीन नातेवाईकांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. चिमुरडीचा मृतदेह शव विच्छेदनासाठी यवतमाळमधील आर्णी रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालानंतर तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.

नातेवाईकांवरच हत्येचा आरोप

नातेवाईकांनीच चिमुकलीची हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. तीन वर्षांच्या मुलीला आधी धान्याच्या डब्यात कोंडण्यात आले, त्यानंतर घराच्या मागच्या बाजूला असलेल्या बाथरुम जवळ आणून ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तपासानंतर पोलिसांनी तिच्या तीन नातेवाईकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तिची हत्या करण्यात आली, याचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्टच आहे.

संबंधित बातम्या :

वाळूचोरी करताना ट्रॉली उलटून दोघांचा मृत्यू, वर्ध्यात नगरसेवकाला अटक

शेतातून परतणाऱ्या बाईकस्वार बापलेकावर काळाचा घाला, कारच्या धडकेत दोघांचाही मृत्यू

लेकरांना घेऊन महिला आत्महत्येसाठी शिवारात गेली पण पोलीसही तातडीनं पोहोचले, औरंगाबादमध्ये नेमके काय घडले?