Nashik Crime : पती-पत्नीच्या वादाला हिंसक वळण, पोलिसांसमोरच मामाकडून भाचजावयाच्या हत्येचा प्रयत्न

| Updated on: Jul 29, 2023 | 8:38 AM

पती-पत्नीमध्ये काही कारणातून वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी पती-पत्नी भरोसा सेलकडे गेले. मात्र वाद मिटण्याऐवजी भलतंच घडलं.

Nashik Crime : पती-पत्नीच्या वादाला हिंसक वळण, पोलिसांसमोरच मामाकडून भाचजावयाच्या हत्येचा प्रयत्न
नाशिकमध्ये कौटुंबिक वादातून मामाकडून भाचजावयावर हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक / 28 जुलै 2023 : नाशिकमध्ये खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. नाशिक शहरातील शरणपूर रोड सिग्नल येथे असलेल्या भरोसा कक्षात घडलेल्या घटनेने सर्वाना धक्का बसला आहे. पती-पत्नी आपला वाद मिटवण्यासाठी भरोसा कक्षात आले होते. मात्र अचानक पत्नीच्या मामाने जावयावर चाकू हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर भरोसा कक्षात सर्वत्र रक्तच रक्त झाले होते. या हल्ल्यात पती गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानकपणे घडलेल्या या घटनेने शरणपूररोड पोलीस चौकी येथे खळबळ निर्माण झाली. सरकारवाडा पोलिसांनी आरोपी मामाला ताब्यात घेतलं आहे.

पती शांत उभा असताना पत्नीच्या मामाने अचानक हल्ला केला, त्यामुळे यामागे प्लॅन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय..

सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंगरक्षकामुळे आरोपी ताब्यात

भरोसा कक्षात आरडा ओरड झाल्याने बाहेर आवाज आला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्तांचा अंगरक्षक प्रकाश खैरनार यांनी धाव घेत आरोपीच्या हातातला चॉपर पकडला. आरोपी चॉपर घेऊन पळत होता. खैरनार यांनी तातडीने सरकारवाडा पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने हल्लेखोराला ताब्यात घेतले. खैरनार यांनी रिक्षाचालकाला थांबवून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. जनतेची सेवा म्हणून आपण हे धाडस दाखवल्याचे खैरनार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, पती-पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद होता, असं नेमकं काय झालं की पत्नीच्या मामाला चीड आली आणि त्याने स्वतःच्या भाचीचे कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला, याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. पोलीस तपासाअंतीच सर्व स्पष्ट होईल. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांसमोरच ही घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.