विश्वास नांगरे पाटलांचा चर्चेत आलेला ‘तो’ पॅटर्न पडला अडगळीत; पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा काय?

| Updated on: Mar 20, 2023 | 3:15 PM

अधिकारी शहर सोडून गेले तरी त्यांनी घेतलेले काही निर्णय आठवणीत राहतात. काही प्रसंग घडले की त्या अधिकाऱ्यांच्या निर्णयाची आणि त्यांची आठवण येत असते. अशीच आठवण नाशिककरांना विश्वास नांगरे पाटील यांची येत आहे.

विश्वास नांगरे पाटलांचा चर्चेत आलेला तो पॅटर्न पडला अडगळीत; पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा काय?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : काही अधिकारी असे असतात की त्यांनी राबवलेली यंत्रणा शहराला एक वळण लावून जात असते. त्यामुळे शहरात एक प्रकारची शिस्त निर्माण होत असते. काही अधिकाऱ्यांचे शहरापुरते घेतलेले निर्णय हे कधी कधी राज्यासाठी महत्वाचे ठरत असतात. राज्यातील सर्वच शहरांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाते. असाच एक निर्णय नाशिक शहराचे तत्कालीन आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात विश्वास नांगरे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू झाला होता. त्यात काही शहरांनी अंमलबजावणी देखील केली होती. आणि त्याचा फायदाही शहराला झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत होते.

अधिकारी बदलले की यंत्रणा देखील नव्या पद्धतीने काम करत असते. विश्वास नांगरे पाटील हे नाशिक शहराचे पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले होते तेव्हा त्यांच्याकडून नाशिककरांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामध्ये नागरे पाटील यांनी अनेक मोठे निर्णय घेतले होते.

शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी निर्भया पथक, क्युआर कोड स्कॅनिंग, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही संस्थांना घेऊन त्यांनी काही मशीन बसविले होते. रात्रीच्या वेळी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी काही ऑपरेशन राबविले होते. त्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांचा गुन्हेगारांवर जरब बसू लागला होता.

हे सुद्धा वाचा

अशातच नागरिकांमध्ये पोलिसांचा वावर अधिकाधिक असावा. गस्त वाढावी यासाठी क्यु आर कोडिंग यंत्रणा राबविली गेली होती. बीट मार्शलच्या माध्यमातून ही यंत्रणा राबविली जात होती. मात्र, नंतरच्या काळात नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाल्याने ही यंत्रणा हळूहळू अडगळीस पडत गेली.

क्यु कोड स्कॅनिंग करण्यासाठी बीट मार्शल यांची गस्त असायची. त्यामुळे गुन्हेगार देखील पोलिसांचा वावर शहरात दिसत असल्याने दचकून होते. मात्र, आता शहरात दिवसा ढवळ्या गोळीबार, हल्ले घडत आहे. खुनाच्या घटना घडत आहे. त्यामुळे शहरात पोलिसांची गस्त आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.

शहरात नव्याने रुजू झालेले अंकुश शिंदे यांच्या कारभारावर नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. शहरात आठवड्यात तीन गोळीबारच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे नाशिककरांना नांगरे पाटील यांची क्यु आर कोड प्रणाली आठवू लागली असून गस्त वाढवण्याची मागणी नागरिक करू लागले आहे.

क्यु आर कोडमुळे बीट मार्शल यांचा वावर शहरात दिसून येत होता. मात्र आता बीट मार्शल म्हणजे टपाल पोहचविणे, पोलिस ठाण्यात कागदपत्रांची कामे करणे अशा बाबी दिसून येत आहे. त्यामुळे क्यु आर कोडची यंत्रणा धूळखात पडून असल्याचे दिसून येत आहे.