पंढरपुरातील विठ्ठल साखर कारखान्यात भ्रष्टाचाराचा आरोप, अध्यक्ष भगीरथ भालकेंच्या अडचणीत वाढ

| Updated on: Sep 27, 2021 | 9:47 AM

कारखान्याच्या संदर्भातील अनेक प्रश्न अभिजित पाटील यांनी कारखान्याकडे लेखी दिले असून येत्या 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे

पंढरपुरातील विठ्ठल साखर कारखान्यात भ्रष्टाचाराचा आरोप, अध्यक्ष भगीरथ भालकेंच्या अडचणीत वाढ
भगीरथ भालके
Follow us on

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यासह सर्व संचालक मंडळाने गळीत हंगाम 2020-21 मध्ये रिकव्हरी कमी दाखवून सुमारे 20 कोटी रुपये किमतीची साखर बेकायदेशीररीत्या परस्पर विक्री केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधित सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कारखान्याचे सभासद आणि धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केली आहे.

कारखान्याच्या संदर्भातील अनेक प्रश्न अभिजित पाटील यांनी कारखान्याकडे लेखी दिले असून येत्या 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे

अभिजित पाटील यांनी कारखान्याच्या संदर्भात कोणकोणते प्रश्न उपस्थित केले आहेत?

  • गेल्या तीन हंगामात कोणकोणत्या बँकांकडून कर्ज मंजूर झाले आणि किती उचलले आहे, त्याचा वापर कुठे कुठे केला?
  • कोणकोणत्या संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांकडे किती कर्ज आहे, वसुलीबाबत काय कारवाई केली?

2020-21 या हंगामात तीन लाख 3 हजार 547 टन उसाचे गाळप होऊन दोन लाख 67 हजार 225 पोती साखर तयार झाली, त्या साखरेतून कारखान्यास 82 कोटी 83 लाख 97 हजार पाचशे रुपये उपलब्ध होत असताना देखील कारखान्याने सुमारे 30 ते 35 कोटी रुपये न देता शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळात दोषी धरुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी अभिजीत पाटील यांनी केली आहे.

पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा

दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी कारखाना हा पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक कारणामुळे विठ्ठल साखर कारखाना डबघाईला आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून विठ्ठल कारखान्याकडे पाहिले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान कारखान्यातील थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लावू, असं आश्वासन दिलं होतं. अजितदादांनी पालकत्व घेतलेल्या कारखान्याची अशी अवस्था पाहून आता सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.

एफआरपीची रक्कम, कामगारांचे वेतन, ठेकेदारांची बिले थकीत

विठ्ठल सहकारी कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांकडून कारखान्याच्या थकीत बिलासाठी राज्य सरकारकडून अनुदान रूपी रक्कम मंजूर करण्याचं आश्वासन भगीरथ भालके यांनी दिलं असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले होते. तर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके हे कारखाना चालवण्यात सक्षम नसल्याचा संचालक युवराज पाटील यांनी केला आहे. मागील वर्षीच्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम, कामगारांचे वेतन, ठेकेदारांची थकीत बिले कारखान्यांकडून अद्यापही देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर वारंवार आंदोलनंही केली आहेत. कारखान्याच्या गेटला कुलूप लावून थकीत बिले द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

कोण आहेत भगीरथ भालके?

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र
भारत भालकेंच्या निधनानंतर रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी
भाजप उमेदवार समाधान आवताडेंकडून भगीरथ भालकेंचा पराभव
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा
दहा वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात कामाचा अनुभव

संबंधित बातम्या :

अजितदादांनी पालकत्व स्वीकारलेल्या कारखान्याची अवस्था वाईट! चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी

पंढरपूर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भगीरथ भालकेंचे पुनर्वसन, दत्तामामांकडून नियुक्ती