स्पाईक घालून का पळतो रे? श्रीलंकन कॅप्टन संतापला; क्रिकेटच्या मैदानात वातावरण तापलं; नेमकं काय घडलं!
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. खरं तर हा सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकलेला आहे. असं असताना श्रीलंकन कर्णधाराने भारतीय संघावर मोठा आरोप केला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या...

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताला 178 धावांची मजबूत आघाडी मिळाली होती. त्यापुढे खेळताना भारतीय संघाने दुसऱ्या डावात 193 धावा केल्या आणि एकूण 371 धावा बोर्डवर लावल्या. यासह श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचं किचकट आव्हान दिलं आहे. गॉल आंतरराष्ट्रीय मैदानाची मागची आकडेवारी पाहून तसंच म्हणावं लागेल. कारण या खेळपट्टीवर चौथ्या डावात इतका मोठा स्कोअर गाठणं कठीण आहे. असं असताना दुसर्या डावात भारतीय संघ फलंदाजी करत होता, तेव्हा श्रीलंकन कर्णधाराचं डोकं फिरलं. कर्णधार धनंजय डी सिल्वा याने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये मानव सुथारची तक्रार पंचांकडे केली. मानव सुथार जाणीवपूर्वक खेळपट्टीच्या मधून धावत असल्याचा आरोप श्रीलंकन कर्णधार धनंजय डी सिल्वा याने केला.
मानव सुथारमुळे खेळपट्टीचं नुकसान?
भारताच्या दुसऱ्या डावात मानव सुथार फलंदाजी करत असताना एक धाव घेण्यासाठी धावला. पण ही धाव घेतान खेळपट्टीच्या प्रतिबंधित भागातून धावला. त्याची ही कृती पाहिल्यानंतर श्रीलंकन कर्णधार धनंजय डिसिल्वा थेट पाकिस्तानी पंच एहसान रजा यांच्याकडे गेला आणि मानव सुथारची तक्रार केली. मानव सुथार हाफ स्पाइक्स घालून फलंदाजी करत होता. त्यामुळे खेळपट्टीच्या मधून धावला तर नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. जर असं काही झालं तर चौथ्या डावात खेळपट्टीवर फलंदाजांना फलंदाजी करणं कठीण जाईल. श्रीलंकेला विजयी धावांचा पाठलाग करायचा असल्याने कर्णधाराची चिंता सहाजिकच आहे. अनेकदा क्रिकेटमध्ये शेपटाच्या फलंदाजांकडून अशी कृती होत असते. त्यामुळे पंच सावध असतात.
अनेकदा खेळाडू खेळपट्टी खडबडीत करण्यासाठी असं काही करत असतात. पण पंचांच्या ही बाब लक्षात आली तर तात्काळ दंडही ठोठावला जातो. फलंदाजाने अशी कृती केली तर पंच त्याला पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतात. हा इशारा संपूर्ण सामन्यासाठी असतो. पण त्यानंतरही फलंदाजाने अशी कृती केली तर त्या चेंडूवरच्या धावा रद्द केल्या जातात. तसेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अतिरिक्त पाच धावा मिळतात.
