डॉक्टर तुम्ही सुद्धा?… काही तासात कुटुंब संपवलं, आधी शिक्षिका पत्नीला मारलं, दोन मुलांना विहिरीत ढकललं अन् स्वत:लाही…

| Updated on: Jun 21, 2023 | 7:44 AM

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरने अख्खं कुटुंब संपवत स्वत:ही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

डॉक्टर तुम्ही सुद्धा?... काही तासात कुटुंब संपवलं, आधी शिक्षिका पत्नीला मारलं, दोन मुलांना विहिरीत ढकललं अन् स्वत:लाही...
veterinary doctor
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाविद पठाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे : शिकलेली लोकं जेव्हा मागचा पुढचा विचार करत नाहीत आणि आपल्यासह कुटुंबाला संपवतात तेव्हा अनेक प्रश्न उभे राहतात. अशी काय गोष्ट असते की त्यामुळे त्यांना इतका टोकाचा निर्णय घ्यावा लागतो. काही प्रश्न कधीच सुटणारे नसतात का? त्यावर काहीच पर्याय नसतो का? केवळ आत्महत्या हाच पर्याय असतो का? हे सर्व प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाले आहेत. दौंड येथील एका घटनेमुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. एका डॉक्टरने अख्खं कुटुंबच संपवलं. स्वत:लाही संपवलं. मुलांना तर विहिरीत ढकलून देण्या इतपत त्याचं धाडस झालं. असं काय घडलं ज्यामुळे या डॉक्टरने स्वत:सह कुटुंबालाच संपवलं? या घटनेमुळे दौंड हादरून गेलं आहे. अन् या घटनेमुळे काही प्रश्नही निर्माण झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड गावात ही घटना घडली आहे. एका पशुवैद्यकीय डॉक्टरने संपूर्ण कुटुंबच संपवल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर असं या 42 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. डॉ. अतुल यांनी आधी शिक्षिका पत्नी पल्लवी अतुल दिवेकर (वय 39) हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलगा अदिवत अतुल दिवेकर (वय 9) आणि मुलगी वेदांती अतुल दिवेकर (वय 6) यांना विहिरीत ढकलून त्यांना जीवे मारलं. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. या घटनेने केवळ दौंड तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

हे सुद्धा वाचा

काय घडलं?

अतुल दिवेकर हे व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. त्यांची पत्नी पल्लवी या शिक्षिका आहे. हे कुटुंब वरवंड येथील गंगासागर पार्कमधील रुम नंबर 201मध्ये राहत होते. त्याने पत्नीचा गळा दाबला. त्यानंतर दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांची हत्या केली. नंतर दिवेकर घरी आले आणि त्यांनी घरात आत्महत्या केली. एक हसतखेळतं कुटुंब काही तासात संपुष्टात आलं.

कौटुंबिक वादातून त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यावर पोलिसांना अतुल आणि पल्लवी यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना तात्काळ मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मृतदेह काढण्यात अडचणी

दरम्यान, घरात मुलं सापडत नसल्याने पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. मुलांचे मृतदेह विहिरीत असल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. पण विहिर प्रचंड खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या.