Pune News: कोंढव्यात किरकोळ वादातून गोळीबार! आता रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांची धडक कारवाई
Pune News : पुण्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच आणि भक्तीमय वातावरण असतानाच कोंढव्यात किरकोळ वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानंतर पोलिसांनी तडक कारवाई केली.

पुण्यात सध्या भक्तीमय वातावरण आहे. गणेशोत्सवाची धूम आहे. या सण उत्सवाच्या वातावरणात विविध मंडळाचे कार्यक्रम सुरू आहे. पण किरकोळ कारणावरून कोंढव्यात काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. यामुळे या भागात दहशत निर्माण झाली होती. रात्री झालेल्या घटनेत जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न टोळक्याने केला होता. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. तर प्रकरणात पोलिसांनी रात्रीतूनच सूत्र हलवून धडक कारवाई केली आहे.
कोंढव्यात काय घडलं?
कोंढवा परिसरात गणपती मंडपाजवळ तरुणावर पिस्टलमधून गोळीबार करण्यात आला होता. मित्रासोबत झालेल्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. ६ सप्टेंबरच्या रात्री साडेअकराच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. दादू भालेराव आणि त्याच्या ८ ते १० साथीदारांनी आरडाओरड करत दहशत निर्माण केल्याचा आरोप होता. दादू भालेराव याने पिस्टलमधून तरुणाच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप आहे. गोळी तरुणाच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार गेल्याने गंभीर दुखापत झाली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात जीवघेणा हल्ला आणि गोळीबाराचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींना अटक केली.
पिस्टलमधून गोळीबार करणाऱ्या आरोपींसह ६ जणांना जेरबंद
पोलिसांनी कारवाई करत ६ सराईत आरोपींना अटक केली. जितेंद्र उर्फ दादू जालिंदर भालेराव, लक्ष्मण उर्फ सोनू उर्फ जांभ्या गजरमल, प्रज्वल उर्फ पज्या बापू कदम यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. दिनेश रामदास घाडगे, कार्तिक महादेव पांडागळे आणि विजय रामदास चोंधे यांनाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींना पोलीस कोठडी रिमांड मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणांकडे बेकायदेशीर पिस्टल आले कुठून, हा हल्ला का करण्यात आला. ज्या तरुणावर हल्ला करण्यात आला, त्याची पार्श्वभूमी याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर अशा गुंडांवर सणासुदीत वॉच ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.