
Rajasthan Crime News : त्या चिमुकल्याच्या आईने त्याचा एखाद्या मुलीप्रमाणे साज केला. त्या चिमुकल्याच्या डोक्यावर ओढणी ठेवली, त्याला काजळ लावलं. सोबतच त्या चिमुकल्याच्या अंगावर दागिने चढवले आणि त्यानंतर आई-वडील यांच्यासह अन्य दोघांनी सामूहिक आत्महत्या केली. या सामूहिक हत्येच्या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घराच्या वादामुळे त्रस्त झाल्याने अख्ख्या कुटंबानेच हे सामूहिक आत्महत्येचे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यात घडली आहे. शिव पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील उण्डू गावात हे सामूहिक आत्महत्येचे कांड समोर आले आहे. घर आणि संपत्तीच्या वादातून एका कुंटबाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे नेमके कारण नमूद करण्यात आले आहे.
शिवलाल यांचा मुलगा नगाराम, नगाराम यांची पत्नी कविता, नगाराम आणि कविता यांची दोन मुलं बजंरग (9) आणि रामदेव (8) अशा चौघांचा समावेश आहे. या चौघांचेही मृतदेह घरापासून साधारण 20 मीटर दूर असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आले आहेत.
पोलिसांना आत्महत्येच्या ठिकाणी एक सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये मृत नगाराम यांनी त्यांच्या भावावर आरोप केले आहेत. माझ्या लहान भावामुळेच मी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत, असे या सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. घर तसेच जमिनीच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या वादामुळे मी आणि माझे कुटुंबीय हा निर्णय घेतोय, असंही सुसाईड नोटमध्ये सांगण्यात आलंय. तसेच आम्हा सर्वांवर घरासमोरच अंत्यसस्कांर करावेत अशी इच्छाही या सुसाईड नोटमध्ये व्यक्त करण्यात आलीय.
दरम्यान, हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर राजस्थान राज्यासह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.